। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणसमस्या आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू धरून साहित्यसंपदातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
लॉकडाऊनमुळे सामाजिक बंधने असताना, ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के. शेख, साहित्यिक रायगडभूषण एल.बी.पाटील उपस्थित होते. साहित्य आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड कशी घालावी, साहित्याच्या माध्यमातून पर्यावरणसंवर्धनास कशी चालना द्यावी याचे मार्गदर्शन शेख सरांनी उपस्थित साहित्यिकांना केले.
उद्घाटनानंतर निमंत्रितांचे काव्यसंमेलन पार पडले. महाराष्ट्रातील विविध भागांतील कवींचा सहभाग ही लक्षणीय बाब ठरली. शंतनू पुराणिक पुणे, अनिता गुजर मुंबई, रवींद्र सोनावणे रायगड यांनी आपल्या बहारदार कवितांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. रसिका लोके ह्यांनी स्वागत प्रमुख आणि समन्वयक म्हणून सोनाली शेडे यांनी म्हणून काम पहिले. पर्यावरण दिनानिमित्त साहित्यसंपदाच्या माध्यमातून झाडे लावू या हे पर्यावरण गीत प्रसिद्ध करण्यात आले असून राष्ट्रसंघ पर्यावरण विभागाच्या जागतिक उपक्रमास सर्मप्रित करण्यात आले. संतोष सकपाळ ह्यांनी सदर गीताचे लेखन केले असून त्यांच्याच सुमधुर आवाजातील सदर गीत साहित्यसंपदा डिजिटल पर्व युट्युब चॅनेलवर बघता येईल.