गड किल्ले संवर्धन समितीची पुरातत्व विभागाकडे मागणी
| महाड | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणार्या किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरील अष्टकोनी चौथर्यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणार्या किल्ले रायगड येथे दररोज देश- विदेशासहित राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो शिवभक्त व पर्यटक भेट देत असतात, त्याचप्रमाणे केंद्रातील व राज्यातील मंत्र्यांसहित देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यासहित वेगवेगळ्या पक्षाचे पक्षप्रमुख यांनी रायगडवर भेट दिली आहे, तर अनेकांनी यापूर्वी राजकीय कार्यक्रमदेखील रायगडावर केले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी या चिन्हाचे अनावरण केले होते. यावरून मोठ्या प्रमाणावर शरद पवारांसहित त्यांच्या पक्षावर टीका झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणार्या किल्ले रायगड येथील राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या आणि सर्व शिवभक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या किल्ले रायगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या (राज छत्री) अष्टकोनी चौथर्यावर चढण्यास कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व महासंचालक, नवी दिल्ली येथे लेखी पत्राद्वारे केली आहे.
किल्ले रायगडावर असलेल्या शिवसमाधी येथे विविध कार्यक्रमादरम्यान देश-विदेशातून मान्यवर महाराजांना अभिवादन करण्यास येत असतात, पण अनावधनाने, अतिउत्साहीपणाने हे मान्यवर मूळ समाधीच्या अष्टकोनी चौथर्यावर बांधलेल्या छत्रीखालील भागावर (मूळ समाधीच्या मध्यभागी उभे राहून) अभिवादन करतात. सदर बाब ही पूर्णपणे निंदनीय आणि अशोभनीय तसेच समाधी स्थळाचा अवमान करणारी आहे. याबाबतची अनेक छायाचित्रे व चित्रफित प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवसमाधी वास्तू ही केंद्रीय संरक्षित स्मारक आहे, शिवसमाधीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्व विभागाने कार्यक्रमादरम्यान अशा प्रकारे वारंवार होत असलेल्या अवमानस्पद गोष्टी लक्षात घेऊन माधी चौथर्यावर चढण्यास बंदी घालायला हवी होती. पण तसे काही होताना दिसत नाही. कारण पुरातत्त्व विभागाला शिवसमाधी त्या वास्तूचे महत्त्व, शिष्टाचार याचा विसर पडला आहे, असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या समाधी स्थळावर अष्टकोनी चौथरा हीच छत्रपती शिवाजी महाराजांची मूळ समाधी आहे हे लक्षात घेणे अति महत्त्वाचे आहे. अष्टकोनी चौथर्या वरील छत्रीचे बांधकाम नव्याने केलेले आहे त्यामुळे अष्टकोनी चौथरावर कोणासही चढण्यास बंदी असावी सदर चौथ्यावर साफसफाई सुशोभीकरण यासाठी जावे लागते त्यासाठी नियम अटी असाव्यात, साफसफाई सुशोभीकरण करत असताना छायाचित्र काढण्यात सक्त मनाई असावी, असे छायाचित्र कोणत्याही माध्यमातून प्रकाशित झाल्यास सदर व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची पुरातत्त्व विभागाच्या नियमात तरतूद असावी तसेच भोवती संरक्षित रेलिंग असावेत, याबाबत तातडीने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी गड किल्ले संवर्धन समितीचे प्रसाद चंद्रकांत दांगट पाटील यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना लिहिलेल्या लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे.