। पनवेल । वार्ताहर ।
दिवाळी सणामध्ये मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होत असते. परंतु ही मिठाई अनेक वेळा शरीराला घातक सुद्धा ठरू शकते. कमी दर्जाचा माल, मावा, साखर किंवा इतर पदार्थ यामुळे ही मिठाई अनेकांना त्रासदायक ठरणारी असते. तरी अशा मिठाईपासून सावध राहण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात येत आहे. दिवाळी आणि मिठाई हे एक समीकरण बनले आहे. तसे पहायला गेले तर मिठाई नसेल तर कोणताही सण पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यात दिवाळीत तर मिठाई आणि फराळाची अधिकच मजा असते. कोणताही सण असला की, खव्याची मोठी मागणी असते. त्यामुळे याच दिवसात खवा आणि मिठाईमध्ये भेसळ करुन विक्री केली जाते. दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते. तर याच वाढणार्या विक्रीचा फायदा भेसळखोर घेताना दिसतात. तेव्हा या अन्न पदार्थ भेसळीला रोखण्यासाठी, भेसळखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून खास दिवाळीदरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाते. यावर्षी देखील या मोहिमेला सुरुवात झाली आहे. राज्यभर ही मोहीम एफडीएमार्फत राबविण्यात येत आहे.पनवेलमध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातुन सोमवार (दि.25) पासुन ही मोहीम राबविण्यात येणार आहे.