| आगरदांडा | प्रतिनिधी |
काशिद समुद्रकिनारी औरंगाबद येथील साने गुरुजी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांच्या बुडून मृत्यू झाला, आणि हा किनारा पुन्हा एकदा चर्चेत आला. तसे पाहता, स्वच्छ आणि सुंदर किनारा म्हणून काशिद समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. परंतु, उत्साहाच्या भरात होणार्या अपघातांमुळे मात्र पर्यटनस्थळ बदनाम होत आहे. मुलांचा अति उत्साह जीवघेणा ठरतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्या मुलांना यावेळी आवरणे हे मोठे आव्हान शिक्षकांसमोर असते. परंतु, हाच आततायीपणा आज जीवघेणा ठरत असून, त्यामुळे किनार्यांची ऐरणीवर येत आहे.
दरम्यान, भरती-ओहोटीचे गणित लक्षात न घेतल्यास समुद्रात उडी घेणे जीवावर बेतू शकते. किंबहुना प्राणाशी खेळ करतो आहोत याचेही भान पर्यटक विसरतात आणि मृत्यूला कवटाळतात. तेव्हा पर्यटकांनी सावधपणा बाळगला पाहिजे. नाहीतर, लाख मोलाचे जीव गमावावे लागतात. पोटचा गोळा, घरचा कर्ता-धर्ता गेल्यावर त्या कुटुंबावर काय बेतते याची कल्पना करवत नाही.
मुरुड समुद्रकिनारी 1991 साली महेंद्र अँड महेंद्र कंपनीच्या सात कामगारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर 6 जुलै 2014 रोजी चेंबूर येथील सहा व्यावसायिकांना पोहताना जलसमाधी मिळाली. फेब्रु. 2016 ची आबिदा इनामदार कॉलेजच्या तब्बल 14 विद्यार्थ्यांना पोहता न आल्याने प्राण गमवावे लागल्याची घटना तर भयंकर होती. या दुर्घटनेनंतर शिक्षण उपसंचालकांना परिपत्रके काढून सहलींवर एकार्थी निर्बंधच घालणे भाग पडले.
काशिद ग्रामपंचायतीतर्फे समुद्रावर ठळकपणे खोल समुद्रात पोहणे धोकादायक आहे, असे सूचनाफलक लावण्यात आले असले तरी पोलिसांना गुंगारा देऊन बर्याचशा दुर्घटना घडल्याचे पुढे आले आहे. बुडालेल्यांची संख्या 2008 पासून 2014 पर्यंत 33 आहे. नुकताच औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सानेगुरुजी विद्यालयातील माध्यमिक शाळेतील इयत्ता दहावीच्या दोन विद्यार्थ्यांना काशीद येथील समुद्रात जीव गमवावा लागला आहे.
काशीद येथील समुद्र किनारा मोठा असल्याने सर्वच ठिकाणी जीव रक्षक तैनात ठेवणे कठीण आहे. तरीसुद्धा पर्यटकांना कोणताही धोका पोहचू नये यासाठी काशीद ग्रामपंचायतीने पर्यटकांची काळजी घेणे खूप आवश्यक असल्याचे मत अनेक मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असल्याने मोठा महसूलसुद्धा काशीद ग्रामपंचायतीला मिळत असतो.
काशीद समुद्रकिनारी शेकडोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. सर्वांना लाईफ जॅकेट पुरविणे ग्रामपंचायतीला शक्य नाही. परंतु, बोटीमधून प्रवास करणार्यांना लाईफ जॅकेट दिले जात आहे. शासनाने ग्रामपंचायतीला मदत करावी. आम्ही सर्व मदतकार्य पोहोचवण्यास तयार आहोत. सध्या तीन जीवरक्षक समुद्रकिनारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्पीड बोटधारक पर्यटक बुडाल्यास मदतीला धावून येतात. समुद्रकिनारी सूचना फलक तसेच भरती-ओहटीची वेळसुद्धा लिहिण्यात आलेल्या आहेत. – सुशांत ठाकूर, ग्रामसेवक, काशिद
काशीद ग्रामपंचायतीने पर्यटकांची काळजी घेण्यासाठी समुद्रात पोहण्यासाठी जाणार्या प्रत्येकला लाईफ जॅकेट देऊन त्यांच्या जीविताचे रक्षण करावे. लाईफ जॅकेटशिवाय पोहण्यास सक्त मनाई करावी. पर्यटकांच्या मृत्यूमुळे इतर पर्यटन स्थळांवर परिणाम होतो, याचा शासनाने अभ्यास करुन, तात्काळ उपाययोजना कराव्यात. यासाठी पर्यटनमंत्र्यांनी लक्ष घालावे. – श्रीकांत सुर्वे, अध्यक्ष, मुरुड तालुका प्रवासी संघटना