| कर्जत । वार्ताहर ।
कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज यांचा उत्सव अक्षय तृतिये पासून सुरू झाला. त्या निमित्ताने शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेला कुस्तीच्या आखाड्यात शेवटची कुस्ती कल्याणचा भावेश साळवी आणि नाशिकचा ज्ञानेश्वर केरे यांच्यात रंगली. साळवी याने केरे याला चितपट केल्याने तो अजिंक्य ठरला तर लहान गटातील नऊ कुस्त्या चितपट करणार्या युवराज भगतला ’आखाडा किंग’ म्हणून सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे या आखाड्यात महिलांच्या कुस्त्याही झाल्या. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षे कुस्ती स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या म्हणून यंदा कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
सकाळी नऊ वाजल्यापासून स्थानिक कुस्तीगीरांमध्ये कुस्ती होऊन कुस्त्यांना प्रारंभ झाला. कर्जत तालुका कुस्तीगीरी अध्यक्ष भगवान धुळे यांच्या हस्ते उद्घघाटन झाले. याप्रसंगी जेष्ठ पंच मारुती ठाकरे, दत्तात्रेय पालांडे, देवस्थानचे अध्यक्ष गणेश शिंदे, प्रकाश आणेकर, महेंद्र चंदन, मनोज वरसोलीकर, गौरव भानुसघरे,सचिन दगडे, नितीन गुप्ता, मुकेश पाटील, मोहन भोईर, अजय वर्धावे आदी उपस्थित होते. सकाळच्या सत्रात 44 कुस्त्या झाल्या. त्यामध्ये महिलांच्या 5 कुस्त्या झाल्या तर दुपारच्या सत्रात 41 कुस्त्या झाल्या. त्यामध्ये 6 महिलांच्या कुस्त्या झाल्या. आशा एकूण 85 कुस्त्या झाल्या. दोन्ही सत्रात पंच म्हणून दिपक भुसारी, रमेश लोभी आणि दत्तात्रय म्हसे यांनी काम पाहिले. शेवटची महत्वपूर्ण कुस्ती कल्याणचा भावेश साळवी आणि नाशिकच्या ज्ञानेश्वर केरे यांच्या मध्ये रंगली. यामध्ये साळवी याने केरेला चितपट करून अजिंक्यपद पटकावले. या कुस्ती साठी कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी अकरा हजार रुपयांचे रोख पारितोषिक ठेवले होते. अन्य कुस्ती रसिकांनीही यामध्ये रोख रकमा जाहीर केल्याने ही कुस्ती रोख सोळा हजार आठशे रुपयांची होती.
सूत्रसंचालन दिनेश बागवे आणि दिलीप ठाकरे यांनी केले. स्मिता म्हामुणकर, पंकज बडेकर, अधिक जैन, अभिजित मुधोळकर, मंगेश देशमुख, आण्णा मोकल, नितीन गुप्ता यांनी विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी विशेष सहकार्य केले. यावेळी मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, नाशिक आदी भागांतून आलेले पहेलवान या कुस्ती स्पर्धेत सहभागी झाले होते. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेले असंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते.