वन आणि रेल्वे खात्याच्या मंजुरीत अडकलेय रस्त्याचे काम
। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव व इंदापूर शहरात वाहतूक कोंडी सतत होत असल्याने प्रवासी नागरिकांची चांगलीच रखडपट्टी होत आहे. तळ कोकणासह गोव्याकडे जाणार्या नागरिकांना माणगाव बाजारपेठेत अडथळा होऊ नये म्हणून माणगावच्या बाहेरून शहराला बायपास रस्ता काढला असून या बायपास मार्गाचे काम पाच वर्षापासून थांबले आहे. हा बायपास रस्ता वनखात्याच्या जमिनीतून व कोकण रेल्वेला उड्डाण पूल होत असल्याने इंदापूर आणि माणगाव येथील दोन्ही शहरालगतचे बायपासचे काम रखडले आहे. त्यामुळे दोन्ही बाजारपेठेत सण उत्सवात व लगीन सराईत वाहतूक कोंडी होत असते. याचा नाहक फटका नागरिकांना बसत आहे. त्याचबरोबर बायपास रस्त्यात काही शेतकर्याच्या जमिनी जात असल्याने त्या जमिनेचे भूसंपादनाचे कामात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने बायपास रस्त्याच्या कामाला ब्रेक लागत असून बायपास मार्गाच्या कामाचा तिढा कायम राहिला आहे.
माणगाव कळमजे पुलाजवळून नाणोरे गावालगत या बायपास रस्त्याचे काम 2017 मध्ये सुरु झाले. पाच वर्षात हे काम 5 टक्के करण्यात आले. हा बायपास रस्ता सात कि.मी. चा असून तो माणगाव शहरा बाहेरून काढण्यात आला आहे. या रेल्वे मार्गावर उड्डाण पूल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या मंजुरीत काही दिवस अडकला होता मात्र रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सुमारे तीन किमी अंतर वनखात्याची जमीन असून वनखात्याच्या मजुरीसाठी हे काम रखडले आहे. त्यातच उर्वरित शेतकर्याच्या जमिनीतून हा बायपास मार्ग जात असल्याने भूसंपादनाचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे बायपासचे काम थांबले असून शासनाने या गंभीर प्रकरणाकडे गाभिर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे माणगावात वाहतुकीचा ताण पडत असून वारंवार वाहतूक कोंडीशी सामना पर्यटक नागरिकांना करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामाचे गेली अनेक दिवस घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे प्रवाशी, पर्यटक, नागरिकांत कमालीची नारीजी पसरली आहे. अखेर शासनावर दबाव वाढत असल्याने या रुंदीकरणाच्या कामाची गाडी धीम्या गतीने का होईना सुरु असून त्या कामाला आणखीन म्हणावा तितकी गती मिळत नाही. मुंबई गोवा महामार्गावरील चौपदरीकरण कामाला गती कधी मिळणार असा संतप्त सवाल नागरिकातून होत आहे.
दुसर्या टप्प्याच्या रस्ता चौपदरीकरणाचे काम इंदापूर ते कशेडी घाट असे सरकारने हाती घेतले आहे. त्याही कामाला फारशी गती मिळाली नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था महामार्गाची झाली असून झाली असून. या महामार्गा बरोबरच पुणे सोलापूर तसेच सोलापूर औरंगाबाद असे महामार्गाची कामे त्यावेळी शासनांनी हाती घेतली होती. मात्र कोकणातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न मागेच पडला असून कोकण वासियांना दहा वर्षानंतरही न्याय मिळालाच नाही. किंबहुना त्यामार्गाची वाताहत चालूच राहिली. शेवटी कोकण वासियांचा अंत सरकार आणखीन किती दिवस पाहणार ? असा संतप्त सवालही प्रवाशांतून बोलताना होत आहे.