कॉलनीतील मार्ग खुला करण्यासाठी चित्रलेखा पाटील यांची शिष्टमंडळासोबत भेट

| अलिबाग | प्रतिनिधी |

आरसीएफ कुरुळ येथील कॉलनीमधून ये-जा करतात. हा मार्ग पादचाऱ्यांसह चालकांना व स्थानिकांना सुरक्षीत आणि सोयीचा मार्ग ठरत आहे. मात्र, हा मार्ग बंद करण्यात आल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे शेकापच्या महाराष्ट्र राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तसेच प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यासह तालुका चिटणीस यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन कॉलनीतून मार्ग पुर्ववत खूला करावा, अशी मागणी शुक्रवारी (दि.23) निवेदनाद्वारे केली आहे.

आरसीएफ कंपनी स्थापन झाल्यापासून कुरुळ, वेश्वी, चेंढरे येथील प्रकल्पग्रस्त, शाळा, महाविद्यालयमधील विद्यार्थी, नोकरदार वर्ग आरसीएफ कुरुळ कॉलनीतून ये-जा करतात. अलिबाग शहर गर्दीने गजबजलेले असते. अशावेळी स्थानिकांना हा मार्ग सोयीचा ठरतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा मार्ग स्थानिकांसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांना अलिबागमधून ये-जा करावी लागत आहे. परिणामी, महागाईच्या काळात हातावर पोट असणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

ही बाब शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या लक्षात येताच स्थानिकांसह नागरिकांचा विचार करून बंद केलेला मार्ग पुर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांच्यासह शेकाप महाराष्ट्र राज्य मिडीया सेलच्या अध्यक्षा तसेच प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी दिवसांपुर्वी केली होती. परंतु, कंपनी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे शेकाप राज्य मिडिया सेलच्या अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा शुक्रवारी (दि.23) आरसीएफ कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेत मार्ग पुर्ववत सुरू करावा अशी मागणी केली. यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, वेश्वीचे माजी सरपंच प्रफुल्ल पाटील, विकास घरत, अवधूत पाटील, आरसीएफ थळ कंपनीचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे, उपमहाव्यवस्थापक प्रशासन विभाग विनायक पाटील, उप महाव्यवस्थापक मानव संसाधान विभाग प्रशांत पाटील, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. राकेश कवळे, योगेंद्र भोईर आदी अधिकारी उपस्थित होते.

आरसीएफ कॉलनीतील मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आरसीएफच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. कंपनी प्रशासनाच्या समस्याही जाणून घेतल्या. लवकरच यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

चित्रलेखा पाटील,
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य सोशल मिडिया सेल तथा प्रवक्त्या, शेकाप

Exit mobile version