। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य शासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली असताना अलिबागमधील ब्रह्मा विष्णू महेश चित्रपटगृह शुक्रवार पासून सुरू होत आहे. तब्बल 21 महिन्यांनी सुर्यवंशी या चित्रपटाने शुभारंभ केला जात असून प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे.
सिनेमगृह सुरू करताना किती फायदा होईल? बंद असलेल्या सभागृहातील स्वच्छता कशी करायची? असे एक ना अनेक प्रश्न समोर होते. मात्र सर्व दिव्यातून जाऊन पुन्हा एकदा अलिबागबकरांचे मनोरंजनाचे हे केंद्र पुन्हा एकदा गजबजणार आहे.
रायगड जिल्ह्यात आधीच चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहणार्या प्रेक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे 1980 च्या आसपास भरभराटीस आलेला हा व्यवयास आजच्या घडीला पूर्णपणे बंद होईल की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दीड वर्षानंतर चित्रपटगृहे 50 टक्के उपस्थितीत सुरु करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, मुरुड, सुधागड, उरण, माथेरान या आठ ठिकाणी सिनेमागृहेच नाहीत, तर काही ठिकाणचे सिनेमागृह बंद पडले आहेत. ही परिस्थिती कोरोनापूर्वीची होती. कोरोना कालावधीत आर्थिक घडी विस्कटल्याने पुन्हा थिएटर उघडण्यास सर्व दृष्टीने विचार करु लागले आहेत.