आश्वासनांची पूर्तता न झाल्यास गावात फिरकू न देण्याचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाणी प्रश्नावरून लाडीवलीतील महिलांतर्फे करण्यात येणारे उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले आहे. उपोषणाच्या तिसर्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला असला तरी, जर देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास ग्रामपरिसरात फिरकू देणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
दिवसागणिक राज्यातील विविध भागात पाणी प्रश्न जटिल बनत आहे. जिल्ह्यातील लाडीवलीतील ग्रामस्थांच्या पाणी प्रश्नाचे निराकरण होता होत नव्हते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दल रायगड आणि ग्रामस्थ लाडवली यांच्या वतीने 17 नोव्हेंबरपासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.
राष्ट्र सेवा दलाचे रायगड जिल्हा संघटक तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाडीवली येथील विजया मांडवकर, सुरेखा वाघे, ज्योती पाटील, रेखा कालेकर, राजेश्री म्हामणकर, दर्शना म्हामणकर, निता वाघे, मानसी वाघे, आशा शेडगे, सविता पवार अशा एकूण बारा महिलांनी पाण्यासंदर्भातील प्रमुख मागण्यांसाठी उपोषणाची सुरूवात केली.
पाताळगंगा नदीचे दूषित पाणी देणे बंद करून लाडीवली व आजूबाजूच्या आदिवासी वाड्यांना शुद्ध व नियमित एमआयडीसीचे पाणी देण्यात यावे, रा.जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या उपस्थितीत पंचवीस ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या दहा निर्णयांची अंमलबजावणी विनाविलंब करण्यात यावी आणि बेजाबाबदार रा.जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा अभियंते आणि ग्रामपंचायत गुळसुंदे यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.
या उपोषणानंतर गेल्या वर्षभर सुस्तावलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता मध्यरात्रीपासून सुमारे एक तास उपोषणकर्त्यांची मनधरणी करीत होते. परंतु रायगड जिल्हा परिषद आश्वासना व्यतिरिक्त काहीच करत नाही, त्यामुळे आम्हाला तुमच्याशी बोलायचे नाही. तुम्ही काही करत नाही म्हणूनच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे ठणकावत उपोषणकर्त्यांनी सुरुवातीचे दोन्ही दिवस उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
यानंतर पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहूल मुंडके यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या भावना समजून घेत, तात्काळ पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांना कळवून गटविकास अधिकारी आणि संबंधित गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच तूराडे आणि वावेघर ग्रामपंचायतीच्या अधिकार्यांची बैठक बोलावली. या बैठकीत तात्काळ निर्णय घेण्याची सूूचना करण्यात आली.
दरम्यान, उपोषणाचा तिढा कायम राहिल्याने पुन्हा एकदा पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी गटविकास अधिकारी एमआयडीसी अभियंते गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेत मागण्यांच्या पूर्ततेबाबत तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. तर दुसरीकडे अलिबाग तालुका पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी कार्यकारी अभियंता एस. डी. येझरे, उप अभियंता वेंगुर्लेकर आणि उपोषणकर्त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेत आणखी एक संधी देण्याची विनंती केली.
यानंतर राजश्री म्हामणकर या उपोषणकर्त्या महिलेने गुळसुंदे ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा विभागाच्या मागील अनुभवांचा पाढा वाचत हे अधिकारी आश्वासना व्यतिरिक्त काही देत नाही असा आरोप केला. तसेच आम्ही इथे मेलो तरी चालेल, पण एमआयडीसीचे पाणी किती दिवसात देतील हे सांगितल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
अखेर उपोषणाच्या तिसर्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री, यापुढे असा निष्काळजीपणा होणार नाही, असे सांगत कार्यकारी अभियंता एस डी येझरे आणि उप अभियंता वेंगुर्लेकर यांनी एक लेखी आश्वासन दिले.
या आश्वासनात 1) एम आय डी सीकडून नवीन नळ जोडणी टॅपिंग करून जल जीवन मिशन मधील एक कोटी नऊ लाख चौरयाहत्तर हजार रुपये रकमेची अंदाजपत्रकीय जल जीवन मिशन योजना तात्काळ राबविण्यात येईल, यासाठी तूराडे आणि वावेघर ग्रामपंचायतीकडून जुने थकीत बिल एक कोटी एकोनव्वद लाख चाळीस हजार पैकी एम आय डी सी ने टप्प्यातील पहिल्या निश्चित केलेली रक्कम पुढील चार महिन्यात भरण्याबाबतचे हमीपत्र संबंधित तूराडे व वावेघर ग्रामपंचायतीकडून घेण्यात आले आहे सदर ग्राम पंचायतींनी पुढील चार महिन्यात चखऊउ चे थकित बिल न भरल्यास रा.जि. प. पाणी पुरवठा विभागामार्फत दोन्ही ग्रामपंचायतींचे एम आय डी सी कडील पाणीपुरवठा खंडित करण्याबाबत लेखी शिफारस करण्यात येईल,2) सद्यस्थितीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दृष्टीने पंचवीस ऑक्टोबर रोजी लाडीवली गावांतील मोर्चेकरी, राजिप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उपस्थित घेण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी मीटर बसविणे, वॉल लावून त्यांना लॉकिंग बॉक्स बसविणे, गावांमध्ये पाण्याचे वेळापत्रक लावणे, आणि तीन वर्षापासून रखडलेल्या आमदार निधीतील चावणे जलशुद्धीकरण प्रकल्प ते लाडीवली गावापर्यंतच्या जलवाहिनीचे काम पुढील दहा दिवसात पूर्ण करण्यात येईल आणि 3) चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर तात्काळ दोन कामगारांची नेमणूक करण्यात येईल तसेच चावणे प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पावरील पाणी सोडण्याबाबतचे योग्य नियोजन न करणारे कर्मचारी श्री.विश्वनाथ धुमाळ यांची बदली इतरत्र ठिकाणी करण्यात येईल असे नमुद करण्यात आले आहे.
या आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी हे उपोषण मागे न घेता, तात्पुरते स्थगित करीत असल्याचे सांगितले असून, यापुढे दूषित व अनियमित पाणीपुरवठा झाल्यास एकाही अधिकार्याला किंवा लोकप्रतिनिधीला गावात येऊ देणार नाही असा इशारा उपोषकत्या महिलांनी दिला आहे.