। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल कळंबोली वसाहतीमधील गाळाने भरलेल्या धारण तलावांमुळे वसाहतींना पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. यामुळे गाळ काढण्यास परवानगी मिळावी या करीत पनवेल पालिकेच्या वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. धारण तलावात 80 टक्के गाळ असल्याने केवळ 20 टक्केच पाणी साचू शकते. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नाही. समुद्र सपाटीपासून खाली असलेल्या कळंबोली वसाहतीत सिडकोतर्फे होल्डिंग पॉन्डची निर्मिती करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यापासून वसाहतींचे संरक्षण व्हावे या हेतूने सिडकोने बांधलेले हे धारण तलाव सध्या गाळाने व खारफुटीने भरलेले आहेत. गाळ आणि खारफुटीने भरल्यामुळे या ठिकाणी नेहमीच उग्र वास येत असतो. 80 टक्के गाळ साचल्याने दरवर्षी पावसाळयात कळंबोली शहरात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे या धारण तलावांची स्वच्छता व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.