विजबिल वेळेवर, पण विजेचा लपंडाव सुरूच
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
शिहू-बेणसे विभागातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, वीजवितरण विभागाच्या ढिसाळ व निष्क्रिय कारभाराविरोधात जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
दिवस असो वा रात्र, कोणत्याही वेळी अचानक वीज गायब होत असल्याने संपूर्ण विभाग अंधाराच्या विळख्यात सापडत आहे. परिणामी विद्यार्थी, रुग्ण, महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसाळ्याची सुरवात अद्याप झालीच नाही तर विजेची ही अवस्था असेल तर पुढची गणित कशी असणार असा सवाल जनता विचारत आहे.
शिहू-बेणसे परिसरातील वीज समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनली आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असून, “आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका” असा संतप्त इशारा ग्रामस्थांकडून देण्यात येत आहे. विशेष म्हणजे अजून मुसळधार पाऊस सुरूही झालेला नसताना वीजवितरण विभागाचा गलथान कारभार समोर येत असल्याने जनतेत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
रात्रीच्या वेळी वीज गायब होताच डास-मच्छरांचा अक्षरशः कहर सुरू होतो. उकाडा, अंधार आणि मच्छरांच्या उपद्रवामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. लहान मुले रात्रभर रडत असून, वृद्ध व आजारी नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. सर्प, विंचू आणि इतर किटकांची भीती असल्याने अंधारात घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.
शिहू-बेणसे विभागातील अनेक गावांमध्ये व आदिवासीवाड्या-पाड्यांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत, मोबाईल नेटवर्क सेवा बंद पडत आहे, इंटरनेटवर आधारित शासकीय व निमशासकीय कामे ठप्प होत आहेत. अनेकदा सलग तीन-चार दिवस तर कधी दहा दिवसांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
स्थानिकांच्या मते, विजबत्ती गुल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी व अधिकारी “नॉट रिचेबल” होत असून, समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने जनतेचा संयम आता सुटू लागला आहे. “वीजपुरवठा सुरळीत नसतानाही वीजबिले मात्र भरमसाठ येतात, आणि बिल भरण्यास उशीर झाला तर तात्काळ कारवाई होते,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील जुने व गंजलेले विद्युत खांब तसेच जीर्ण झालेल्या विद्युत वाहिन्या तातडीने बदलाव्यात, वीजपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी वीजवितरण विभागाला दिला आहे.
“पावसाळ्यापूर्वीच विजसमस्या अतिशय गंभीर झाली आहे. डास-मच्छरांचा उपद्रव, सर्प-विंचूंची भीती आणि सततचा अंधार यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, व्यापारी वर्गाचेही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. विजबिल मात्र वेळेवर भरावे लागते; पण सुरळीत वीज मिळत नाही. जुने विद्युत खांब व जीर्ण विद्युत वाहिन्या तातडीने बदलाव्यात, अन्यथा उग्र आंदोलन छेडू.”
उत्तम सावंत,
ग्रामस्थ बेणसे







