। पाली/बेणसे । वार्ताहर ।
मुंबई गोवा महामार्गावरील खांब गावाजवळ असलेल्या सुरगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच संवर्धन व स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी सुरगडावरील बुरुजाकडे जाणार्या पायर्या व बुरुजाची डागडुजी करण्यात आली. तसेच इतर अवशेष व परिसर स्वच्छ करून सुस्थितीत करण्यात आला. या मोहिमेत एकूण 16 शिलेदार सहभागी झाले होतो. गडावर दोन टीम विभागून काम करण्यात आले. एका टीमने गडावर प्रवेश केल्यावर असलेले मारुतीचे मंदिर आणि गडावरील सदर या परिसरात वाढलेले गवत, झाडी काढून तिथला परिसर साफ केला. तर दुसर्या टीमने गडावरील ढालकाठी बुरुजावर जाण्यासाठी काळाच्या ओघात मातीने गाडल्या गेलेल्या पायर्या साफ केल्या व त्यांची डागडुजी केली. तसेच बुरुजाला लागून असलेल्या तटबंदीतील दगड एका ठिकाणी निसटून बाहेर आले होते. त्यामुळे तेथे भगदाड पडले होते. परिणामी त्या तटबंदीला भविष्यात धोका निर्माण झाला असता. तो धोका लक्ष्यात घेऊन तेथील पडलेले भगदाड बुजविण्यासाठी ते दगड पुन्हा योग्यरित्या रचून संभाव्य धोका टाळून त्या तटबंदीला नवसंजीवनी देण्यात आली.
या मोहिमेत अर्जुन दळवी, एकनाथ अस्वले, भूषण पाटील, तेजस खेडेकर, प्रज्ञेश कानडे, विनोद घाडीगांवकर, कृपेश बेलकर, सिद्धेश माने, हेमंत निपाने, चेतन शिंदे, हेमंत जामकर, प्रतीक इंदूलकर, प्रथमेश घोने, प्रतीक साटले, अमित हेगिष्टे व गौरव चव्हाण हे शिलेदार सहभागी झाले होते.