| अलिबाग | प्रमोद जाधव |
पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत. रायगड जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सुमारे दीडशे शाळा (दि.7) मे रोजी मतदानाच्या दिवशी पुन्हा उघडणार आहेत. त्यापैकी अनेक शाळांची पडझड झालेली आहे. त्या शाळा दुरुस्तीसह रंगविण्याचे करण्याचे काम जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडल्या आहेत. 2019 नंतर गेल्या पाच वर्षांत शाळा बंद असल्यामुळे दुरस्तीकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे त्या शाळांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. या शाळांची गरज आता मतदानाच्या दिवशी आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर, माणगाव, खालापूर, मुरुड, रोहा, पेण, महाड, म्हसळा, सुधागड, श्रीवर्धन, तळा, पनवेल, कर्जत, उरण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 160हून अधिक शाळा पटसंख्येअभावी बंद पडल्या आहेत. या शाळांपैकी दीडशे शाळा (दि.7) मे रोजी मतदानाच्या दिवशी उघडणार आहेत. मात्र, मतदानाच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांसह मतदारांची गैरसोय होऊ नये याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या एक हजार 986 शाळा मतदान केंद्र म्हणून निवडल्या आहेत. या शाळांची पाहणी करण्यात आली. ज्या शाळांची दुरुस्ती, रंगरंगोटी करणे आवश्यक आहे, त्यांची रंगरंगोटी व दुरुस्तीचे काम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरु आहे. त्यामध्ये बंद पडलेल्या शाळांपैकी दीडशे शाळांचीदेखील दुरुस्ती व रंगरंगोटी केली जात आहे. बंद पडलेल्या शाळा गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या. शाळांच्या परिसरातदेखील कोणीच फिरकत नव्हते. मात्र, आता निवडणुकीच्या निमित्ताने या शाळांकडे प्रशासाने लक्ष दिले आहे. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना जवळच मतदान केंद्र असावे, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे. त्यानुसार गावातच बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे बंद पडलेल्या शाळांना नवीन झळाळी येणार असून, एक दिवसासाठी तरी शाळा सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत केंद्र अध्यक्षांपासून शिपाई, व मतदारांनी गजबजणार आहेत.
पटसंख्येअभावी बंद पडलेल्या शाळा मतदान केंद्र म्हणून घेतल्या आहेत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्या शाळा दुरुस्ती व रंगविण्याचे काम केले आहे. त्याचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे कामही केले जात आहे.
विक्रम पाटील, तहसीलदार