। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील कोव्हिड स्थितीत सुधारणा झाली असल्याने राज्याप्रमाणेच जिल्ह्यात निर्बंधांमध्ये सवलत देण्यात आली आहे.मात्र तरीही नागरिकांनी कोविडचे नियम पाळणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ड. अनिल परब यांनी व्यक्त केले. 15 ऑगस्टचे मुख्य शासकीय ध्वजारोहण झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ध्वजारोहणानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ऑनलाईन बैठकीत विविध विषयांची माहिती घेतली. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, खासदार विनायक राऊत, आ. राजन साळवी, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. योगेश कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने तसेच जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये उपस्थित होते. अन्य लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. केंद्राकडून जे व्हेंटिलेटर प्राप्त झाले त्यातील निम्म्याहून अधिक बंद असल्याची तक्रार आहे, असे खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आमदारांनी सांगितले. याबाबत प्रत्यक्ष त्याठिकाणी वस्तुस्थिती काय आहे, याची तपासणी करुन जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.तिसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उपलब्ध साधने व त्यातील तूट याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिली. लसीकरण स्थिती आणि आगामी काळाचे नियोजन यावरही यावेळी चर्चा झाली.