| मुंबई | प्रतिनिधी |
नरेंद्र मोदी-अमित शहांसारख्या व्यापार्यांना पैशांच्या जोरावर आणि तपास यंत्रणांचा गैरवापर करत महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव करता येणार नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ठणकावले. काही ऊरबडव्यांना सोबत घेत भाजप विजय मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. मात्र, आता जनता त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, त्यामुळे राज्यात अनेक मतदारसंघात भाजपचा पराभव निश्चित आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
तपास यंत्रणांच्या मदतीने आणि नरेंद्र मोदी, अमित शहांसारख्या व्यापर्यांनी एकत्र येत पैशांच्या जोरावर महाराष्ट्राच्या अस्मितेचा पराभव केला, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. मात्र, ते शक्य नाही. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि अस्मितेची लढाई आहे. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे या बारामतीतून विक्रमी मताधिक्याने विजयी होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुनित्रा पवार यांनी त्यांच्या पतिराजाने बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न केला, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघ भाजप दारण पराभवाच्या छायेत आहेत. महाराष्ट्रातील अनेक विद्यमान खासदार संसदेत दिसणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवले आहे. तर नारायण राणे यांच्याबाबतीत पराजयाचा चौकार मारला जाईल. आम्ही त्यांचा तीनदा पराभव केला आहे. मुंबई आणि कोकणात आम्ही त्यांचा पराभव केला आहे. आता ते लोकसभेच्या मोठ्या मैदानात उतरले आहेत. या लढाईतही त्यांना चितपट केले जाईल. महाविकास आघाडीचे विनायक राऊत संसदेत जाणार आहेत. नरेंद्र मोदी किंवा अमित शहा आले तरी राज्यातील जनता त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यांनी 10 वर्षे लावल्या तेवढ्या टोप्या पुरे झाल्या. आता राज्यातील जनता हे सहन करणार नाही, असेही राऊत म्हणाले.