| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव रेल्वे स्थानकाला रायगड टर्मिनस असे नामकरण करा. अशी मागणी काँग्रेस कमिटीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड यांनी नवी मुंबई बेलापूर येथील कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या कार्यालयात मुख्य महाप्रबंधक यांचे स्वियसहाय्यक पी. चित्रसेन यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
माणगाव रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या रेल्वेस्थानकाला श्रीवर्धन, म्हसळा, तळा, महाड, पोलादपूर, सुधागड व माणगाव तालुके जोडले आहेत. या सात तालुक्याची लोकसंख्या सुमारे 10 लाख आहे. या नागरिकांसाठी माणगाव हे एकमेव मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. पर्यटनाच्या निमित्ताने लाखोजण दरवर्षी रायगडला भेट देत असतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील माणगाव रेल्वे स्थानकाला अधिक महत्व येत आहे. याचा विचार करून या मार्गावरून हजारो व्यापारी, पर्यटक, नागरिक दररोज प्रवास करतात. मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था असल्यामुळे व कोकण रेल्वेचे विद्युतीकरण व दुपदरीकरण झाल्यामुळे कोकण रेल्वेला अधिक महत्व आहे. याचा विचार करून रेल्वे स्थानकातून ‘रायगड टर्मिनल’ नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
वीर रेल्वे स्थानक ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी.एस.टी.) अशी लोकल रेल्वे सुरु करावी , पेण रेल्वे मार्गामुळे साउथ व दिल्ली प्रवास करणे शक्य झाले आहे. मात्र माणगाव स्थानकात रेल्वे गाड्यांना माणगाव रेल्वे स्थानकावरील थांबा द्यावा अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.