| श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन समुद्रकिनारी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत होते. यामध्ये 2017 व 18 साली तत्कालीन मुख्याधिकार्यांनी ना हरकत दाखले देताना स्थानिक नागरिकांसोबत शहराच्या बाहेरील ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नागरिकांना देखील ना हरकत दाखले दिले होते. बाहेर गावातील असलेल्या नागरिकांकडून समुद्रकिनारी स्टॉल वरती वाद होत असत. चार-पाच दिवसांपूर्वी नगर परिषदेच्या एका महिला कर्मचार्याला देखील एका स्टॉल धारक महिलेकडून धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेवरती धडक देऊन या स्टॉल धारकांना बाहेर काढण्याची जोरदार मागणी केली.
सदर स्टॉल धारकाचा ना हरकत दाखला नूतनीकरण केलेला नसल्यामुळे नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी समुद्रकिनारी असलेले सर्व खाद्यपदार्थांचे स्टॉल उचलून नेले आहेत. मात्र आता नव्याने खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यासाठी ना हरकत दाखला देताना नगर परिषदेने केवळ स्थानिक नागरिकांनाच ना हरकत दाखला द्यावा तसेच जे नागरिक भाड्याने या ठिकाणी राहत आहेत त्यांना देखील दाखला देण्यात येऊ नये, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.