| उरण । वार्ताहर ।
मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दरवर्षी पोलीस यंत्रणेकडून सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. यावर्षी मंगळवारी या अभियानाला सकाळी 6 वाजता सुरुवात झाली. हे अभियान पुढील 36 तास सुरू राहणार आहे. या अभियानात उरण मधील सर्व सागरी किनार्यावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आली. त्याचप्रमाणे तालुक्यातील हद्दीत प्रवेश करणार्यांची ही पोलिसांकडून तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने मुंबई मोरा व अलिबाग मधील रेवस ते करंजा या दोन्ही जलमार्गावरील प्रवाशांची तपासणी केली. यामध्ये मुंबई वरून उरणला येणार्या व मुंबईत जाणार्या प्रवाशांची पोलिसांकडून तपासणी केली. या मोहिमेत पोलिसांकडून यंत्रणेची तपासणी करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
मुंबई शेजारी असलेले उरण हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. कारण 1993च्या मुंबई बॉम्ब स्फोट व मुंबई वरील दहशतवादी हल्ल्यानंतर उरणच्या किनार्यावर कोंबिग ऑपरेशन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे देशातील ओएनजीसी, भारत पेट्रोलियम व तेल आणि ज्वलनशील पदार्थाची साठवणूकची स्थळे असलेले हा संवेदनशील भाग आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा कवच अभियान हे उरणसाठी महत्वाचे आहे.