। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील रसायनी येथील पिल्लई महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी विद्यार्थ्यंसाठी कर्जत एसटी आगाराकडून एसटी सोडण्यात याव्यात, अशी मागणी पालकांनी केली आहे. पालकांनी यासंर्दभाचे निवेदन कर्जत एसटी आगार प्रमुख यांना दिले असून आगाराकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे.
तालुक्यात एसटीने रसायनी येथे जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशेच्या आसपास आहे. त्या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात पोहचण्यासाठी सकाळच्या वेळी मोठी कसरत करावी लागते. पेण, अलिबागकडे जाणार्या एसटी वाहनांची संख्या मर्यादित असल्याने एसटीमध्ये प्रवास करता न येणार्या विद्यार्थ्यांना अधिक खर्च करून खासगी वाहनातून महाविद्यालयात जावे लागते. तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थीसाठी कायमस्वररूपी एसटी सोडण्यात याव्यात अशी मागणी कर्जत विकास संघर्ष समितीने आगार प्रमुख शंकर यादव यांच्याकडे केली. यावेळी कृष्णा जाधव, सतीश पिंपरे उपस्थित होते.