| तळा । वार्ताहर ।
तळा इंदापूर या मार्गावर गेल्या दोन वर्षापूर्वी इंदापूर ते दिघी असा रस्ता रूंदीकरण काम करताना हजारो झाडे तोडून रस्ता तयार झाला. परंतु हा मार्ग आजही
उजाड दिसत असल्याने या मार्गावर येत्या जून महिन्याच्या पावसाळ्यात वृक्ष लागवड करावी अशी मागणी होत आहे. तळा इंदापूर या 15 किमीच्या रस्त्यावर आंबा, काजु, जांभूळ, सावर, पळस, बोंड साग यांची मोठमोठी झाडे होती.
यामुळे या भागात उन्हाळ्यात गारवा, थंड वातावरणात, सावली, फळे, फुले, पर्यावरण पूरक वातावरण होते. परंतु या झाडांची कत्तल करण्यात आली. या मार्गावर घाईघाईने वृक्ष लागवड संबंधित यंत्रणेने केली असली. तरी त्या झाडाना ना संरक्षण, ना पाणी, ना निगराणी यामुळे ती बहुतांश झाडे मरुन गेलेली आहेत.
पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे अत्यंत गरजेचे असताना या भागात उजाड भकास विचित्र असे भयावह वातावरण दिसत आहे.त्यामुळे या भागात पुन्हा वृक्ष लागवड करून त्यांना पाणी देऊन ती जगविण्याची तजवीज केली जावी अशी मागणी या भागातील नागरीक, आणि निसर्ग प्रेमी याचें वतीने होत आहे.