आ. जयंत पाटील यांचे प्रतिपादन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आक्षीतील रस्त्यामुळे आक्षीचा गेटअप बदलून जाईल. चांगल्या रस्त्याने पर्यटकांच्या संख्येत देखील वाढ होईल. मात्र रस्त्याची क्षमता लक्षात घेऊन त्याची काळजी घ्या. समाजासोबत बांधीलकी लक्षात घेऊन आपण काम करीत असल्यामुळे अलिबाग तालुक्यातील प्रत्येक काम हे शेकापक्षामुळेच शक्य झाल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आक्षी येथे केले.
आक्षी येथे दर्शना बुरांडे यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार जयंत पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, अजित माळी, सरपंच नंदकुमार वाळंज, पेझारीचे उपसरपंच अॅड मनोज धुमाळ, शेकाप पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, डॉ दिलीप फालके, नागाव ग्रामपंचायत सदस्य हर्षदा मयेकर, रश्मिन गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्या आश्लेषा नाईक, युवराज पाटील, शक्ती बनकर, डॉ रवी पाटील, विनायक पाटील, सौ. गण आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, सामाजिक बांधीलकी लक्षात ठेवून काम करणे हे आपले काम असून विरोधकांवर टिका करण्याच्या लायकीचे देखील ते नसल्याचे सांगत वैचारिक पातळी नसलेल्यांचे नाव घेणे म्हणजे त्यांची किंमत वाढवल्यासारखी होईल. आतापर्यंत जे विरोधक होते त्यांची वैचारिक पातळी उंच होती. सध्या तरुण मुले वेगळ्या विचारातून काम करताना पाहून समाधान होत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आक्षीतील प्रत्येक विकासाचे काम आपण पुर्ण केले असून पाणी, रस्ता, आणि मच्छिमारांचे प्रश्न मार्गी लावले असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेत पराभव झाला तरी कामाची आम्ही जिद्द सोडली नाही. अलिबाग रोहा रस्त्यासाठी आपणच मंजुरी मिळवून आणली. हा रस्ता आधीच झाला असता मात्र काहींनी अडवणूक केल्याने त्याचे काम रखडले होते. मात्र शेकापक्षाने रस्त्यावर उतरुन त्याचे काम सुरु करण्यास भाग पाडले. बेलकडे ते सुडकोली रस्ता आधी पुर्ण करण्याची सुचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. गावातील प्रत्येक गल्ली स्वच्छ व काँक्रिटची असायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष ठेवा 30 वर्षे हा रस्ता टिकला पाहिजे. रायवाडीच्या पाण्याच्या टाकीचे देखील लवकर काम करुन पाणी टंचाईचा प्रश्न संपवू असे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले.