वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्र अशांत; मान्यवरांकडूनच सामाजिक शांतता धोक्यात
| मुंबई | प्रतिनिधी |
मान्यवर व्यक्तींबाबत ज्येष्ठ नेतेमंडळींकडून वादग्रस्त विधाने करण्याची मालिकाच सुरु झाल्याने राज्यातील वातावरण गेल्या दिवसात कमालीचे बिघडल्याचे दिसत आहे. नव्या पिढीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श न घेता शरद पवार, नितीन गडकरी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात केले आहे.
काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनुद्गार काढले. त्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे ढवळून निघाले आहे. सत्ताधारी भाजप, शिंदे गट, मनसेतर्फे राज्यभरात गांधींच्या विरोधात आंदोलने, निदर्शने सुरु झालेली आहे. शेगाव येथे झालेल्या जाहीर सभेत गदारोळ घालण्याचा मनसेचा प्रयत्नही पोलिसांनी उधळून लावला आहे. ते वातावरण अजूनही शांत झाले नाही तोच शनिवारी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढले. यावरुन पुन्हा वादंग निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी केली. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं आहे. मात्र यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवारांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. इतकंच नव्हे, तर शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं विधान राज्यपालांनी केलं. त्यांच्या या विधानावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून राज्यपालांच्या या विधानावर आक्षेप घेतला जात आहे.
आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण आहेत? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस चांगले वाटायचे, ज्यांना नेहरू चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींचं नाव घ्यायचे. मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
राष्ट्रवादीकडून नाराजी
दरम्यान,यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसनेच नाराजी व्यक्त केली आहे.आ.रोहीत पवार,अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. आहेतराज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. तर भाजपा आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना, विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते, असंही रोहित पवार म्हणालेत.