बोर्ली पंचतनकरांची मागणी; प्रवासी व विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय
| कापोली | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बस स्थानक तब्बल एक वर्षानंतरही वार्यावर असल्याचे दिसून येते आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गत वर्षी बोर्लीपंचतन विभागातील अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस बोर्लीपंचतन येथील एसटी स्टँडवर देखील अतिक्रमणाची कारवाई झाली होती. त्यामुळे स्थानकाकरीता पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांना आसराच उरलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने कारवाई करून एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही माननीय आमदार, खासदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी एस.टी स्थानकासाठी अजिबात प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळे परीसरातील संपुर्ण नागरिक व विद्यार्थी आपली नाराजी व्यक्त करीत आहेत.
श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या बोर्लीपंचतन येथे एस.टी स्थानक नसल्यामुळे विद्यार्थी मासिक पास व एसटीचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. शेखाडी पासून ते दिघी परीसरातील अनेक लोकांना बोर्लीपंचतन हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे कायम गर्दी होत असते. खेडेगावातील प्रवाशांना मुंबई, पनवेल, विरार, नालासोपारा येथे जायचे असेल, तर बोर्लीपंचतन शिवाय पर्यायच नाही. रात्री अपरात्री मुंबईहून आलेला चाकरमानी सकाळ पर्यंत वाहन नसेल तर स्थानकात बिनधास्तपणे बसून राहत असत. मात्र आता आसराच उरला नसल्याने मोठी समस्या व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे
सरकार बदलले आहे त्यामुळे रायगड जिल्ह्याचे नव्याने झालेल्या पालक मंत्री उदय सामंत यांनी तरी आता जातीने लक्ष घालून समस्या कायमची सोडवावी अशी आशा विद्यार्थी व प्रवासी करीत आहेत. बोर्लीपंचतन शहरात प्रशस्त एसटी स्थानकासाठी कायम स्वरुपी जागा शोधणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने आजपर्यंत कुणी ही तसे प्रयत्न करताना दिसत नाहीत. एकतर नादुरुस्त गाड्यांचा भरणा आणि त्यात काही बिघाड झाला तर संपर्क करणार कुठे? विद्यार्थी व इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुढे येणार कोण? आता काही दिवसांनी येणार्या निवडणूका डोळ्यासमोर दिसू लागल्या आहेत. निदान बस स्थानकाचा मुद्दा स्थानिक पातळीवर उचलून धरावा अशी मागणी लोकांकडून होऊ लागली आहे.
परीसरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित परिवहन मंडळाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे गरजेचे आहे. परंतु तसे होत नसल्याने सर्वच लोकं त्यांच्या ह्या कृतीवर प्रचंड नाराज आहेत.
आम्ही गेली अनेक वर्षे बोर्लीपंचतन एसटी स्टँडवर येऊन एसटी चा प्रवास करीत आहोत. पण दुर्दैवाने अतिक्रमण कारवाई करून तोडण्यात येऊन भग्न झालेल्या स्थानकाला पाहून वाईट वाटते. तरी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालणे आवश्यक आहे.
श्रीकांत ठसाळ
खुजारे प्रवासी
काही मुलं दिघीवरुन बोर्लीपंचतन तर काही आदगांव, वेळासहून नाना साहेब कनिष्ठ महाविद्यालयात येतात. परंतु आता एसटी स्थानक नसल्यामुळे विद्यार्थी मासिक पास मिळणे कठीण झाले आहे. तरी, मा.आमदार खासदारांनी लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हा विद्यार्थ्यांना होणारी गैरसोय दूर करून एसटी स्थानक नव्याने उभारणीसाठी प्रयत्न करावेत.
सानिका दिवेकर
विद्यार्थीनी, वेळास