माथेरानकरांसह पर्यटकांचा मार्ग होईल सुखकर
| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये काळानुरूप महत्त्वाचे बदल घडत आहेत. मनमोहक पॉईंट, चालण्याजोगे रस्ते यामुळे माथेरान एक वेगळी छाप सोडत आहे. त्यामध्ये जर ई-रिक्षा माथेरानमध्ये सुरू झाली तर पर्यटकांसह नागरिकांनाही हा मार्ग सुखकर होऊन माथेरानकरांची आर्थिक उन्नती होऊन ई-रिक्षामुळे पर्यटन क्रांती घडू शकते. पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ माथेरान हे मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.इतर पर्यटनस्थळापेक्षा वेगळेपण जपणारे माथेरान हे हिरवी गार वनराई, मोटरवाहनांना बंदी असल्याने प्रदूषणमुक्त शहर, लाल मातीचे रस्ते यामुळे पर्यटकांना आकर्षित करते. मात्र, टॅक्सी स्टँड (दस्तुरी) ते माथेरान रेल्वे स्थानक हे दोन किलोमीटरचे अंतर चालताना पर्यटकांची दमछाक होते. दिव्यांग व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी हा टप्पा पार करणे म्हणजे तारेवरची कसरत.
सरासरी दिवसाला तीन हजार पर्यटक येत असतात. त्यातील मिनिट्रेनच्या दहा फेर्यामध्ये 900 पर्यटक जातात. बाकीचे पर्यटक घोडा किंवा हातरिक्षाचा आधार घेतात. आता नवीन पर्याय म्हणून ई-रिक्षाची मागणी जोर धरू लागली आहे. उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली असून, याबाबत माथेरानच्या देखरेख समितीला ट्रायल घेण्याबाबत कोर्टाकडून सांगण्यात आले.पुढील काही दिवसात तीन वेगवेगळ्या प्रकारच्या ई-रिक्षाचे ट्रायल घेतले जाणार आहे. या ट्रायल जर यशस्वी झाल्या तर माथेरानमध्ये स्थानिकांची आर्थिक क्रांती होऊन माथेरानचे पर्यटन बहरेल. ई-रिक्षा काही काळात सुरूही होईल, पण ती सुरू करताना अश्वचालकांनाही विश्वासात घेणे महत्त्वाचे ठरेल.
पर्यटकांना नवा प्रवास पर्याय
ई-रिक्षाची चाचणी जर यशस्वी झाली तर पर्यटकांची ससेहोलपट दूर होऊन पर्यटकांना नवा प्रवास पर्याय होऊ शकतो. यामुळे पर्यटकांचा वेळ वाचणार आहे, तसेच पैशाचीसुद्धा बचत होऊ शकते.
ई-रिक्षासाठी पोषक क्ले-पेव्हरब्लॉक रस्ता
टॅक्सी स्टँड (दस्तुरी) ते पांडे प्ले रोडपर्यंत एमएमआरडीएमार्फत महात्मा गांधी रस्त्याचे नूतनीकरण होत आहे. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा गॅबीयन वॉल केल्या असून, लाल मातीवर मातीपासून बनवलेले क्ले-पेव्हरब्लॉक बसविण्यात येत आहेत. त्यामुळे हा रस्ता धूळविरहित होऊन ई-रिक्षासाठी पोषक असणार आहे.
विद्यार्थ्यांना मोठा फायदा
शासनाने विद्यार्थ्यांसाठी वाहनाने प्रवास करणे अनिवार्य केले आहे. पण याच्य विरुद्ध चित्र माथेरानमध्ये दिसून येत आहे. येथील विद्यार्थी तीन किलोमीटर पाठीवर दफ्तर घेऊन पायपीट करत असतात. आदिवासी गावातील विद्यार्थी तर सहा किलोमीटर चालत येतात. त्यातील तीन किलोमीटर डोंगरातील पायवाट चढून आणि तीन किलोमीटर ओबडधोबड रस्त्यावरून चालत यावे लागते.पण जर ई-रिक्षा सुरू झाली, तर आमची पायपीट थांबून शिक्षण घेणे सुकर होईल.
आम्ही कोर्टात याचिका दाखल केली. कोर्टाने देखरेख समितीला माथेरानमधील रस्त्यावर ई-रिक्षाची चाचणी घेण्याचे सांगितले आहे. याबाबत देखरेख समितीबरोबर आमची मिटिंगसुद्धा झाली. देखरेख समितीसुद्धा याला सकारात्मक आहे. आता याची चाचणी कधी होते, याकडे आमचे लक्ष लागून राहिले आहे.
सुनील शिंदे, याचिकाकर्ते