अंगाचा दाह कमी करण्यासाठी पाण्याचा आधार
| कोलाड | वार्ताहर |
निरभ्र आकाश व कोरड्या वातावरणामुळे सर्वत्र कमाल तापमानात वाढ झाल्याने प्रचंड उष्मा जाणवू लागला आहे. वातावरणात प्रचंड वाढलेल्या उष्म्याचा जनजीवनावर परिणाम होत आहे.
प्रचंड वाढलेल्या उष्म्यामुळे सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे प्रचंड चटके बसत आहेत. तर सकाळी 11 च्या नंतर सहसा घरातून बाहेर पडताना कोणीही दिसत नसल्याने रस्ते ही निर्मनुष्य दिसत आहेत. तसेच प्राणी देखील तळी, डबकी तसेच अन्य पाण्याच्या जागा झाडांच्या सावलीचा आधार घेत आहेत, उष्म्यापासून सुटका करण्यासाठी नागरिकही नदीच्या अथवा समुद्राच्या पाण्यात भिजून अंगाची झालेली दाह कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या तापमानाचा चढलेला पारा येत्या काही दिवसात आणखी वाढणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यामुळे पुढील दिवसात याही पेक्षा कठीण अवस्था राहणार आहे. त्यामुळे पावसाळी हंगामातील शेतीच्या पुर्व मशागतीची कामे बर्याच अंशी खोळंबली असून मशागतीच्या कामावर परिणाम होऊ लागला आहे. जेमतेम सकाळी 11 वाजेपर्यंत आणि दुपारी 4 नंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत शेतकरी वर्ग शेतात काम करीत आहेत. तसेच प्रचंड उष्म्यामुळे मजूर शेतीच्या कामाला मिळत नाही, असे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. बदलत्या हवामानामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागल्यामुळे येथील नागरिकांची चिंता वाढली आहे.