कार्यकर्त्यांचे चोचले पुरवताना हात आखडता घ्यावा लागणार
| मुंबई | प्रतिनिधी |
निवडणूक लढवायची म्हटलं की उमेदवारासोबत कार्यकर्त्यांचा राबता आलाच. त्यांना सांभाळण्यासाठी दिवसभर रसभरित खानपान आणि रात्री लाखो रूपये खर्चून जेवणावळी पार पाडल्या जातात. मात्र, आता याच जेवणावळींवर निवडणूक आयोगाची वक्रदृष्टी पडली आहे.
सकाळच्या नाश्त्याचा खर्च, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणावर खर्च किती असावा याचे दरपत्रकच तयार केले आहे. त्यामुळे आपला निवडणूक खर्च ठरवून दिलेल्या मर्यादेतच रहावा म्हणून उमेदवारांना आता जेवणावळीवर खर्च करताना हात आखडता घ्यावा लागणार आहे. परिणामी कार्यकर्त्यांची खप्पा मर्जी होण्याची भिती उमेदवारांनी सतावत आहे.
लोकसभा निवडणूकीत उमेदवाराला जास्तीत जास्त 95 लाख रूपयांचा खर्च करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच दैनंदिन खर्चाचे तपशील सादर करणे बंधनकारक करतानाच कोणत्या घटकावर किती खर्च करावा, सभेचा खर्च, रॅलीची खर्च, जेवण-खावण, नाश्ता, ज्यूस आदींच्या किंमती मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी निश्चित केल्या आहेत.
सदरच्या दरात कार्यकर्त्यांना रसभरित, चमचमीत खानपान देणे शक्य होणार नसल्याचे दिसत आहे. मात्र सदरची बाब निवडणूक खर्चात मोजली जाणार असल्याने कार्यकर्त्यांना मनपसंद जेवण देण्यावर मर्यादा येणार आहेत. दरम्यान उमेदवाराने स्वत:हून आपल्या खर्चाचा तपशील सादर करणे बंधनकारक असले तरी उमेदवार प्रत्यक्ष किती खर्च करतो, कुठे काय चालले आहे यावर वॉट ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाची पथके कार्यरत आहे.
खाद्यपदार्थांचे दरपत्रक चहा - 10 रूपये नाश्ता (पोहे, उपमा, शिरा आदी) - 25 रूपये वडापाव - 15 रूपये जेवण (शाकाहारी) - 110 रूपये जेवण (मांसाहरी) - 140 रूपये पुलाव - 75 रूपये पुरी भाजी - 60 रूपये पाव भाजी - 70 रूपये थंडा - 10 रूपये
अनधिकृत जेवणावळी जोरात निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या दर पत्रकानुसार मिळणारे जेवण कार्यकर्त्यांच्या घशाखाली उतरत नसल्याचे वास्तव आहे. सकाळचा नास्ता दुपारचे जेवण कसेबसे कार्यकर्ते घशाखाली उतरवत असले तरी रात्री मात्र त्यांना चिकन बिर्याणी, मटणाबरोबरच बैठीकची व्यवस्था करावी लागत आल्याची माहिती एका राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याने सांगितले. दररोज लाखो रुपयांचा खर्च या जेवणावळीवर होत आहे.