1 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा; हजारो वीज ग्राहकांचा पाठिंबा
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे, नवीन स्मार्ट वीज मीटरबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष आणि वाढत्या वीजबिलांच्या प्रश्नावर आता जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे. माणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते रणधीर कनोजे यांनी दि.1 ऑगस्ट रोजी येथील महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाला शहरासह तालुक्यातील अनेक वीज ग्राहकांनी पाठिंबा दर्शविल्याने या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रणधीर कनोजे यांनी आरोप केला की, महावितरणने अनेक ठिकाणी ग्राहकांना पुरेशी पूर्वसूचना, समुपदेशन किंवा संमती न घेता नवीन स्मार्ट वीज मीटर बसविले आहेत. या मीटरमुळे वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, अनेक सामान्य कुटुंबांचे मासिक आर्थिक गणितच कोलमडले आहे. त्यामुळे तातडीने नवीन मीटर हटवून पूर्वीचे मीटर पुन्हा बसवावेत आणि वाढीव व वादग्रस्त वीजबिले माफ करण्यात यावीत, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय गेल्या तीन महिन्यांपासून अनेक ग्राहकांना नियमित वीजबिले मिळत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. वीजबिलांचे वितरण करणारा ठेकेदार बदलल्यानंतर बहुतांश बिले मोबाईलवर पाठविण्याची पद्धत अवलंबण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील तसेच अनेक शहरी कुटुंबांकडे स्मार्टफोन नसल्याने किंवा डिजिटल सुविधांचा अभाव असल्याने त्यांना वीजबिलाची माहितीच मिळत नाही. परिणामी बिल भरण्यासाठी ग्राहकांना महावितरण कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून, अनेकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी बिल न भरल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित केल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत. वारंवार होणारा वीजपुरवठा खंडित होणे आणि विद्युतदाब कमी-जास्त होण्याच्या समस्येमुळे घरगुती उपकरणे, व्यापाऱ्यांच्या यंत्रणा, उद्योगधंद्यातील मशिनरी तसेच दवाखान्यांतील महागडी वैद्यकीय उपकरणे खराब होत असल्याचा आरोपही कनोजे यांनी केला आहे. या नुकसानीची भरपाई कोण करणार, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, प्रशासनाने वेळेत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर दि.1 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल आणि पुढील काळात व्यापक लोकसहभागातून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशाराही रणधीर कनोजे यांनी दिला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे माणगावसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, महावितरण यावर कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, लघुउद्योजक आणि रुग्णालये या सर्वांनाच या परिस्थितीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. माणगाव शहराची लोकसंख्या, वाढते नागरीकरण आणि वाढती वीज मागणी लक्षात घेता शहरासाठी स्वतंत्र विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) तातडीने उभारण्यात यावे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणे आणि कमी-जास्त दाबाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, असा रणधीर कनोजे यांचा दावा आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी मोठे आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने जुन्या मीटरबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील ग्राहकांनाही न्याय मिळावा आणि नवीन स्मार्ट मीटर हटवून जुने मीटर बसविण्याबाबत निर्णय घ्यावा. तसेच, हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेविरोधातील नसून, सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. जनतेवर अन्याय होत असेल तर शांत बसणार नाही.
रणधीर कनोजे,
सामाजिक कार्यकर्ते, माणगाव







