पर्यावरण प्रेमींचा झाडे तोडण्यावर आक्षेप

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोतवाल खलाटी ग्रामस्थांचा विरोध असताना देखील पाली साई डोंगर येथे टोरंट कंपनीकडून येथील जमिनीवर अतिक्रमण कायम ठेवले आहे. वन विभागाने आपली जमीन धरणे बांधण्यास देण्याचा निर्णय घेतला असल्याने त्या जमिनीवर असलेली 200 वर्षे जुनी झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान जंगलातील झाडे तोडण्यास स्थानिक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून, तेथील जंगलात लावलेल्या आगी बद्दल देखील संताप व्यक्त केला आहे.

अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलेला टोरंट जलविद्युत प्रकल्प कर्जत तालुक्याच्या मानगुटीवर बसवण्यात आला आहे. या प्रकल्पाला सर्वबाजूंनी विरोध केला जात असून, स्थानिक पाली तर्फे कोतवाल खलाटी ही ग्रामपंचायत पूर्णपणे धरणाच्या विरोधात आहे. मात्र, तरीदेखील शासनाच्या हस्तक्षेप आणि शासनाचा छुपा पाठिंबा यामुळे टोरंट कंपनीला बळ मिळाले आहे. कंपनीला वन विभागाने 640 एकर जमीन दिली असल्याचे स्थानिक पातळीवर बोलले जात आहे. त्यानंतर त्या जमिनी मधील जुनी झाडे नष्ट करण्याचे कारस्थान टोरंट कंपनी कडून सुरू आहे. झाडे नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याची अनेक घटना घडल्या आहेत. त्यात आता 100 ते 200 वयोमान असलेली जुनी झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. झाडे स्थानिकांच्या डोळ्यासमोर तोडली जात असून, वन विभागाच्या क्षेत्रातील ही झाडे तोडली जात असताना वन विभागाचा एकही कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन आक्षेप घेत नसल्याने स्थानिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. स्थानिकांनी दळी जमिनीमधील झाडे तोडली तरी आवाज उठवणारे वन विभाग आता आहे कुठे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसावर आलेल्या पावसाळा लक्षात घेता हजारो झाडे नष्ट होण्यापासून वाचली आहेत.

Exit mobile version