बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वात गेटसमोर उपोषण
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
तोंडरे येथील हायकल कंपनीच्या गेटच्या बाजूला 17 मार्चपासून शेतकर्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. कंपनीतील स्क्रॅपचे काम, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम, बॉयलरची राख बाहेर काढण्याचे काम, फोरक्लिप, हायड्रा, अॅम्ब्युलन्स आदी वाहने कंपनीस पुरवण्याचे काम, कंत्राटी कामगार पुरवण्याचे काम मिळावे, या सर्व कामांमध्ये भूमीपुत्रांना समाविष्ट करावे, या मागण्यांसाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण सुरू केले. यावेळी शेकापचे काशिनाथ पाटील, युवा नेते विजय पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, ज्ञानेश्वर पाटील, विष्णू जोशी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
तळोजा एमआयडीसीत हायकल कंपनी ही येथील शेतकर्यांच्या जमिनीवर स्थापन झालेली आहे. या कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी 1999 पासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्रव्यवहारदेखील करण्यात आले आहेत. 2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार केलेली असून, ही कंपनी येथील शेतकर्यांच्या जमिनीवर स्थापन झाल्याची माहिती महामंडळाने माहिती दिलेली असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. मात्र, शेतकर्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. देशाच्या विकासासाठी जमिनी त्याग करणार्या भूमीपुत्र शेतकर्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन न राहल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकल्पामध्ये दहा ते बारा कुटुंबं अवलंबून असताना भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकर्यांवर कंपनी स्थापनेकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. कंपनी व्यवस्थापन शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकर्यांनी हायकल कंपनी गेटच्या बाजूला आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.