जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन; शिवसेना ठाकरे पक्ष स्थानिकांच्या पाठीशी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात पाली खालाटी मध्ये होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्या ठिकाणच्या आदिवासी लोकांना त्रास आणि त्यांच्या जमिनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश रोखला जावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे वतीने रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन दिले असून, टोरंट कंपनीकडून तेथे होणारे अतिक्रमण रोखण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, टोरंटविरोधात कर्जत तालुका शिवसेना ठाकरे पक्ष शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरला आहे.
टोरंट कंपनीच्या पाली कोतवाल खलाटी येथे होत असलेल्या जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक पातळीवर प्रचंड विरोध आहे. त्या भागात प्रकल्पासाठी वन विभागाने जमीन दिली असल्याचे बोलले जात असून, सध्या त्या भागात जमिनीमधील माती परीक्षण आणि दगड परीक्षण सुरू आहे. त्यासाठी टोरंट कंपनीच्या कामगारांची घुसखोरी खासगी जमिनीमध्येदेखील सुरू आहे. या प्रकल्पाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विरोध करण्यात येत असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर कर्जत तालुका शिवसेना ठाकरे पक्षाकडून विरोध केला जात आहे.
टोरंट कंपनी ज्या ठिकाणी धरण बांधणार आहे, त्या भागातील जमिनीचे मालक असलेली शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे. ही लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये घुसखोरी करणाऱ्या टोरंट कंपनीकडून संबंधितांवर कारवाई व्हावी तसेच तेथील जमिनीमध्ये होणारे प्रवेश थांबवावा, अशी मागणी घेऊन शिवसेना ठाकरे पक्ष अलिबाग येथे रायगड पोलीस अधीक्षक यांच्या भेटीसाठी अलिबाग येथे पोहोचला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाचे कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, या भागाचे जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांच्यासह शेतकरी मोहन भुंडेरे, संजय हिलम, सुदाम पवार, अतुल भोईर, राम वाघमारे, ज्ञानेश्वर पवार, हरी जाधव, बाबल पवार, शंकर पवार, राजू पवार, दशरथ पवार, विष्णू पवार, वरुण मुकणे, चिंधू जाधव, भाऊ जाधव, हरीभाऊ पवार, रमण पवार आणि नारायण पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
ग्रामपंचायत पाली हद्दीतील मोहमाळवाडी, आंबेवाडी, पाली आदिवासी वाडी, येशील काही भागांत वनविभागाच्या काही जमिनी दळी असून तेथे या जमिनी आता 25 शेतकऱ्यांच्या नावे आहेत. सदर जमीनीतून वेगवेगळी पिके घेत असतो. काही जमिनींवर आंबा लागवड देखील केली आहे. या जमिनीमध्ये टोरंटो पॉवर कंपनीने काही कामे सुरु केली आहेत. सॉईल टेस्टींग, जमिनीमध्ये काही मशिनरीदेखील उतरविल्या आहेत. त्याबाबत टोरंटो पॉवर प्रशासनाला तसेच वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यांच्याकडून या तुमच्या जमीनी नसुन त्या सर्व्हे नं 32 मध्ये आहेत असे सांगून आमची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे आदिवासी लोकांचे नावे पट्टे असलेली जमीन असताना देखील त्या जमिनीत सुरू असलेले बेकायदा अतिक्रमण तसेच होत असलेली दादागिरी रोखण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.आता जिल्हा पोलिस अधीक्षक याबाबत स्थानिक आदिवासी लोकांना संरक्षण देणार काय? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.







