। पेण । वार्ताहर ।
पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. या भूसंपादनाच्या विरोधात येथील शेतकरी 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आमदार जयंत भाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे मोर्चाने धडकणार आहेत. पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव-गडब, डोलवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावातील 2120 एकर जागा संपादन करण्याचे ठरवले आहे. त्या प्रकारच्या नोटीसादेखील प्रांत्त कार्यालयातून काढण्यात आलेले आहेत. 418 एकर जे.एस.डब्ल्यू आणि 165 एकर सरकारी जमीन वगळता 1537 महाराष्ट्र शासनाने नियोजित डोलवी औद्योगिक प्रकल्पाकरिता सुमारे 2100 एकर जमिनीसाठी अधिसूचना काढली आहे. सदरच्या जमिनीची मागणी जेएसडब्ल्यू स्टील डोलवी -पेण कंपनीने केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन कायद्यांतर्गत पास थ्रू पद्धतीने दिली जाणार आहे.
शेतकरी आपल्या शेती व आपले अस्तित्वासाठी सनदशीर मार्गाने लढाई लढत आहे. त्यांना भविष्याची काळजी सतावत आहे. एमआयडीसीने भूसंपादनाचे तोटे आज मुंबईनजीक असलेल्या येथील शेतकर्यांना माहित झाले आहे. त्यामुळे शासनाने व राजकीय मंडळींनी यात शेतकर्यांना गृहीत धरून निर्णय घेऊ नये. ज्या भागात भुसंपादन होत आहे तेथील जनता सुज्ञ आहे. हा परिसर राष्ट्रीय महामार्गाने, रेल्वे मार्गाने, जलमार्गाने जोडलेला आहे. त्यामुळे भांडवलदाराची नजर या परिसरावर पडली आहे. राजकीय मंडळींनी शेतकर्यांच्या हिताचा विचार करणे गरजेचे आहे. पण शेतकर्यांच्या बाजूने आजतरी निर्णय होताना दिसत नाही. शासन व प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकर्यांना मानसिक , शारीरिक, व आर्थिक त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे. नियोजित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्प प्रस्ताव रद्द करावा. खार्या पाण्याने भिजत असलेल्या शेतीची नुकसान भरपाई द्यावी. शासकीय जमीन या येथील जनतेच्या सार्वजनिक उपक्रमासाठी राखीव ठेवाव्यात त्या कँपनीस विक्री अथवा भाडे पट्ट्याने देऊ नये. शासकीय जागा गावठाण विस्तारासाठी मिळाव्यात. जेएसडब्लु कँपनी च्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण व पर्यावरण व मानवी जीवनावर दुष्परिणाम होत आहे. भविष्यात कँपनी च्या विस्तारिकरणामुळे स्थानिकांची गावे विस्थापित होण्याचा धोका आहे. त्यामुळे जेएसडब्लु कँपनीस वाढीव औद्योगिकीकरणांस परवानगी देऊ नये. या मागण्यासाठी वरील सर्व विभागातील शेतकरी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सनदशीर मार्गाने आमदार जयंत पाटील, आमदार रवीशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, सामाजिक कार्यकर्त्यां उल्का महाजन, वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील आदींसह हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत.