। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मंडणगड तालुक्यातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 डी. डी. या महामार्गात बाधित होणार्या तालुक्यातील शेतकर्यांवर जमीन अधिग्रहणाच्या मुद्यांवर भूमिग्रहण अधिकारी तथा प्रातांधिकारी दापोली यांच्याकडून अन्याय होत आहे. या अन्यायाचा काळ्या फिती लावून शेतकरी निषेध व्यक्त करणार आहेत.
तालुक्यातील 11 गावांतील 297 शेतकरी व त्यांचे कुटुंबीय असे सुमारे 1 हजार स्थानिक लोक स्थानिक प्रशासनाविरोधात काळ्या फिती लावून निषेध करणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या संदर्भात निवेदन देऊन शेतकर्यांना न्याय मिळावा, म्हणून विनंती करणार असल्याचे नमूद केले आहे, अशी माहिती संघटनेचे प्रमुख रमेश घडवले, कौस्तुभ जोशी यांनी दिली.
याबाबतचे निवेदन मंडणगड तालुका शेतकरी संघटना अंर्तगत राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती म्हाप्रळ ते पाचरळ यांच्या वतीने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांना देण्यात आले असून, निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती हे 6 डिसेंबर 2021 ला आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देणार आहेत.
आंबडवे गावाशी संबंधित असणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने स्थानिक प्रशासनाकडून शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. बाधित शेतकरी गत दोन वर्षांपासून सनदशीर मार्गाने स्थानिक प्रशासनाकडे दाद मिळवण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासन हे दडपशाही, भूलथापा व बळजबरीने कार्यवाही पूर्ण करण्याचा मार्ग अवलंबत आहे. राष्ट्रीय महामार्ग भूमी अधिग्रहण अधिकारी तथा प्रातांधिकारी दापोली हे वेगवेगळ्या युक्त्या-प्रयुक्त्या काढून कागदपत्र, त्यांच्याकडे उपलब्ध नसलेले अभिलेख आपल्याकडे उपलब्ध असल्याचे उच्च न्यायालय मुंबई येथे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.