खासदार इम्तियाज जलील यांचा अदिती तटकरे यांना सवाल
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
आपल्या घरातील किती लोकांनी राजकारणात मोठ्या जागा अडवून ठेवल्या आहेत,आपले वडील खासदार, तुम्ही राज्यमंत्री, तुमचा भाऊ आमदार आहे, तर बाकी कार्यकर्ते काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का “असा उपरोधिक प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांना विचारला, त्यावर आदिती तटकरे म्हणाल्या, “आम्ही तीनही जण हे लोकांमधून निवडून आलो आहोत. जनतेला मंजूर असेल म्हणून त्यांनी आम्हाला निवडून दिले असेल,”
सरकारनामा ओपन माईक चॅलेंज या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी धमाल उडवून दिली. ‘सरकारनामा हिट वेव्ह,’ ‘सरकारनामा फेस ऑफ’, अशा रंगतदार कार्यक्रमात उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सहकारी लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना चपखलपणे उत्तरे दिली.
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख व भाजपचे आमदार परिणय फुके यावेळी उपस्थित होते.
“कमी वयात आपण मंत्रीपदी आहेत. तुम्हाला लोकसभेत जायला आवडेल का,” या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, “माझे वडील पंचवीस वर्ष आमदार होते. त्यानंतर ते खासदार झाले. तसाच राजकीय प्रवास मी करणार आहे,”
आमदार धीरज देशमुख यांनी आदिती यांना “अजितदादा की सुप्रियाताई” असा खोचक प्रश्न विचारला. पण आदिती यांनी तेवढ्यात हजरजबाबीने त्याला उत्तर दिलं. त्या म्हणाल्या,”राज्यात अजितदादा, अन् केंद्रात सुप्रियाताई,”
“सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील दोन मंत्रीपदे खाली आहेत, तुमचं दोन अडीच वर्षांचं काम पाहून तुमच्या पक्षश्रेष्ठींना वाटलं की तुम्हाला कॅबीनेटमंत्री करावं, तर तु्म्हाला गृहमंत्री की अल्पसंख्याकमंत्री व्हायला आवडेल,” असा प्रश्न आमदार परिणय फुके यांनी केला.
या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या, “मी सध्या तर राज्यमंत्री म्हणून खूश आहे. पहिल्या टर्ममध्ये राज्यमंत्रीपद मिळणं ही देखील मोठी गोष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत पंचवीस वर्ष महाविकास आघाडीचं सरकार टिकेल. त्यामुळे पुढच्या टर्ममध्ये कॅबीनेटमंत्री व्हायला आवडेल.
राज्यातील तरुण नेत्यांच्या मनातील महाराष्ट्र काय आहे, पत्रकारांच्या भूमिकेतून नेत्यांनीच नेत्यांना विचारलेले तिखट प्रश्न अन् त्याला मिळालेले हजरजबाबी उत्तर, राजकारणापलीकडे जाऊन रंगलेला हा ‘राजकीय सामना’नुकताच या कार्यक्रमात पाहायला मिळाला.
राजकीय कार्यक्रमातील हा हटका प्रयोग नुकताच रंगला. कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी अराजकीय गप्पा मारल्या, अराजकीय प्रश्नांना उत्तर दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि रेडिओ मिरचीचे आरजे राहुल यांनी केले.