| अलिबाग | प्रतिनिधी |
राज्य शासनाच्या आदेशानुसार 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत जवळपास दोन महिन्याच्या कालावधीत समुद्रात मासेमारी करण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाने आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या मच्छिमारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी दि.1 जून ते 31 जुलै 2025 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग संजय पाटील यांनी केले.
या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तरी सर्व मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांनी बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीकरिता अलिबाग कोळीवाडा, बंदररोड, कस्टम हाऊस जवळ, अलिबाग दूरध्वनी क्र.02141-295221 येथे संपर्क साधावा, असे सांगण्यात आले आहे.