पाणी नसल्याने मृतांच्या नातेवाईकांची गैरसोय
सिडको मनपाच्या असमन्वयाचा परिपाक
| पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहतीमध्ये इतर अनेक समस्या आणि प्रश्न आहेत. त्यातच स्मशानभूमीत मरणोत्तर यातना सहन कराव्या लागत आहे. या ठिकाणी पाणी नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचा समन्वय नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
कामोठे वसाहतीची लोकवस्ती मोठी आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये आणखी भर पडत आहे. दोन रेल्वे स्थानक आणि पनवेल सायन महामार्गालगत असणार्या कामोठे कॉलनीमध्ये कनेक्टिव्हिटीमुळे लोकसंख्या अधिक आहे. त्यामुळे नैसर्गिक व अपघाती मृत्यूंची संख्या सुद्धा जास्त आहे. परिणामी वसाहतीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येणार्या मृतदेहांचे प्रमाण सुद्धा जास्त आहे. ही स्मशानभूमी सिडकोने पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित केलेली आहे. येथे अनेक गोष्टींची कमतरता स्मशानात जाणवते. गेल्या काही महिन्यांपासून कामोठे येथील या स्मशानभूमीत पाणी नसल्याची माहिती पुढे आली आहे. अंत्यविधीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते.
त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना हातपाय धुण्यासाठी, तसेच केस कर्तनाच्या अगोदर आणि नंतर आंघोळ करावी लागते. त्याचबरोबर शौचालय आणि स्वच्छतागृहातही पाणी नसल्याने अंत्यविधीसाठी येणार्या मृतांच्या नातेवाईकांची कुचंबणा होत आहे. स्मशानभूमी महानगरपालिकेकडे हस्तांतरित केली असली तरी पाणीपुरवठा सिडकोकडूनच केला जातो. परंतु याठिकाणी पाणीच नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. परिणामी कामोठेकरांना मरणोत्तर यातना सहन कराव्या लागतात.
कोणत्याही स्मशानभूमीत पाण्याची उपलब्धता असणे क्रमप्राप्त आहे. परंतु कामोठे वसाहतीतील स्मशानात पाणीच नसल्याचे उघड झाले आहे. याकडे सिडको आणि पनवेल महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. कामोठेकरांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
– अर्जुन डांगे, स्थानिक