नामांतराचा प्रस्ताव मंजूर
। मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विधिमंडळात मंजूर झाला त्याबद्दल अभिनंदन. मात्र त्याठिकाणी स्थानिक भूमिपूत्रालाच नोकरी मिळाली पाहिजे, अशी आग्रही मागणी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि.25) विधानपरिषदेत केली.
विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला. आता हा मंजूर झालेला प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी दोन्ही सभागृहातील सदस्यांचे अभिनंदन केले. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र या विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे, ही मागणी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
दिबा यांनी उरणचा लढा, जेएनपीटीचा लढा उभारला. त्याला रायगड जिल्ह्यातील शेतकर्यानी पाठिंबा दिला. वीस वर्षे त्यांनी हा लढा सुरु ठेवला. यामध्ये पाच हुतात्मा झाले. त्यांचाही गौरव झाला पाहिजे, अशी मागणीही पाटील यांनी केली. या लढ्यात स्वत: जेलमध्ये राहिलो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांचे सहकार्य मिळाले असल्याची आठवणही त्यांनी करुन दिली.
आज दिबा यांचे नाव विमानतळाला देण्यामध्ये गंगाधरराव यांचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे. याबाबत आवर्जून उल्लेख करीत जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचे देखील अभिनंदन केले.
दरम्यान, गुरुवारी औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराला धाराशिव असे नामांतर करण्याचा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाने एकमताने मंजूर केला. हे प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.