| उरण | वार्ताहर |
महिन्याभरापासून उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली. तेव्हापासून लोकांचा कल थंड पेयांकडे वाढू लागला आहे. याचा गैरफायदा काही जणांनी घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक शीतपेय विकणार्या दुकानांमध्ये खुलेआम भेसळ केली जात असून, वापरण्यात येणारा बर्फही अशुद्ध पाण्यापासून बनविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात जागोजागी थंड पेयाची दुकाने थाटली आहेत. उसाचा रस, सरबत, पेप्सी आदी गोष्टींसाठी वापरण्यात येणारा बर्फ अशुद्ध पाण्यापासून बनवला जात आहे. लस्सी, बदामशेक, आईस्क्रीम, कुल्फी यासाठी खवा वापरण्यात येतो. तसेच या पदार्थामध्ये दुधाची मलाईसुद्धा वापरली जाते. खवा व दूध यात भेसळ होत असल्यामुळे ही शीतपेये पिण्यासाठी हानिकारक असतात. त्यांच्यामुळे बालके व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे प्रशासनं मात्र या दुकानदारीकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शीतपेये विकणार्या गाडीवाल्यांनी नगरपरिषदेचा परवाना काढलेला नाही. अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा परवाना नाही. या थंडपेयाच्या सेवनामुळे बालके व नागरिकांच्या आरोग्यास काही धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.