| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायतच्या सरपंचपदावर आघाडीच्या उषा पारधी यांची बिनविरोध निवड झाली आहे.उषा कृष्णा पारधी यांनी 14जुलै रोजी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता.पारधी यांनी भारतीय जनता पार्टी,शेतकरी कामगार पक्ष आणि आरपीआय आठवले गटाचे माध्यमातून विकास आघाडी म्हणून सरपंच पदाचा फॉर्म भरला होता.
नेरळ ग्रामपंचायतच्या 2019 साली थेट सरपंच म्हणून विजयी झालेले शिवसेनेचे रावजी शिंगवा यांचे आकस्मिक निधन झाले होते.त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक पीठासीन अधिकारी माणिक सानप यांचे अध्यक्षतेखाली झाली.अनुसूचित जमाती राखीव असलेल्या सरपंच पदासाठी 14 जुलै रोजी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रभाग क्रमांक एक मधून निवडून गेलेल्या उषा पारधी आणि प्रभाग दोन मधून निवडुन गेलेल्या पार्वती पवार यांनी पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी 14 जुलै रोजी आदेश लेखी दिल्याने सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता.मात्र दुपारी दोन वाजता सरपंच पदाची निवड करण्यासाठी सभा सुरू होताच पार्वती पवार यांनी पक्षाच्या आदेशाने आपला अर्ज मागे घेतला.त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली.विशेष सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य गैरहजर होते,तर उषा पारधी, नितीन निर्गुडा,मंगेश म्हसकर,श्रद्धा कराळे,पार्वती पवार,धर्मानंद गायकवाड, शारदा साळेकर,शंकर घोडविंदे,जयश्री मानकामे,गीतांजली देशमुख,राजेंद्र लोभी,संतोष शिंगाडे,शिवाली पोतदार,उमा खडे आणि प्रथमेश मोरे असे 15 सदस्य उपस्थित होते.सरपंच पदाच्या निवडणुकीचे महत्व लक्षात घेऊन कर्जत तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड हे प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उपस्थित होते.तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.तर ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी पीठासीन अधिकारी यांना निवडणूक कामी सहकार्य केले.
नवनिर्वाचित सरपंच उषा पारधी या शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी आघाडी मधून नेरळ ग्रामपंचायत मध्ये शेकापच्या उमेदवार म्हणून निवडून गेल्या होत्या.त्यामुळे त्यांची सरपंच म्हणून निवड होत असताना शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर कर्जत आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे देखील उपस्थित होते.