। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील प्रकल्पातील विषारी सांडपाणी प्रकल्पा ( कंटेनर यार्ड )च्या आवारा बाहेर असलेल्या खाडीत सोडल्याने खोपटा, पागोटे, नवघर, भेंडखळ खाडीतील शेकडो मासे मरून पडले आहेत. जस जसे हे विषारी पाणी वाहून दुसऱ्या खाडीत, तलावांमध्ये जाईल तसे तसे आणखी मासे हे ( दुषित ) विषबाधा झालेल्या पाण्यामुळे मरुन पडतील अशी भिंती मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील व्यक्त यांनी व्यक्त केली आहे.
उरण तालुक्यातील भेंडखळ, नवघर, पागोटे, बांधपाडा, कोप्रोली, दिघोडे, वेश्वी, चिर्ले, विधणे ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणारे कंटेनर यार्ड निर्माण झाले आहेत.अशा यार्ड मध्ये शासकीय नियमांची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात केमिकल मिश्रित द्रव्य असले ड्रमची,हजार टन क्षमतेच्या हायड्राची साठवून केली जाते.त्यामुळे लिकेज झालेल्या ड्रम, हायड्रा मधून किंवा यार्ड मध्ये सर्व्हिसिंग करण्यात येणाऱ्या हायड्रा, कंटेनर मधिल केमिकल, विषारी पाणी हे वारंवार नाल्यातून खाडी किनाऱ्यावर सोडले जात आहे.त्यामुळे अशा दुषित विषारी पाण्यामुळे तलावा मधिल, खाडीतील विविध जातींचे मासे मरण पावले आहेत.
या अगोदर बांधपाडा, कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील ग्लोबिकाँन या माल हाताळणी कंटेनर यार्ड कडून केमिकल मिश्रित द्रव्य खाडीत सोडल्याने मासे मरण पावले होते.यासंदर्भात मनसेचे तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी उरण तहसील, प्रदुषण नियंत्रण मंडळ याकडे तक्रार दाखल केली असता घटना स्थळावर शासकीय अधिकारी वर्गाने पाहणी केली. तसेच भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील खाडीतील विविध जातींचे मासे मरण पावल्याने ग्रामपंचायत कडून व सामाजिक कार्यकर्ते याकडून ही तक्रार दाखल करण्यात आली होती.परंतु संबंधित प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते.
या घटनेनंतर पुन्हा गुरुवार दि.१५ डिसेंबर २०२२ रोजी पागोटे, भेंडखळ, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील पाण्यात जिताडा,करपाल, बोईट, कोळंबी, कटला, काळामासा, घोया यासारखी महागडे मासे मरून पडल्याची दुदैवी घटना घडली आहे.सदर मासे हे खाडीत सोडण्यात आलेल्या केमिकल मिश्रित विषारी पाण्यामुळे मरण पावले असल्याचे येथील मासेमारी करणाऱ्या बांधवांकडून सांगण्यात येत आहे.
एकंदरीत कंटेनर यार्ड मधिल केमिकल मिश्रित कंटेनर धुतलेले पाणी प्रकल्पातील नाल्यात सोडल्यामुळे हा प्रकार झाला आहे. मात्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी हे उरण तालुक्यात वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने व शेतकऱ्यांच्या या परिसरातील रहिवाशांच्या तक्रारी कडे आर्थिक हित संबंध जपत दुर्लक्ष करीत असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना, रहिवाशांना न्याय मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी या घटनेसंदर्भात व्यक्त केली आहे.