विधिमंडळात प्रश्न उपस्थित होणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य निवृत्त कर्मचार्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. त्या उपोषणाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.यामुळे उपोषणकर्त्या कर्मचार्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.दरम्यान,दोनच दिवसांपूर्वी या उपोषणकर्त्यांची शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनीही भेट घेऊन शासनाने या उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करावा,असे आवाहनही केले होते.तरीही अद्यापपर्यंत शासनाचा प्रतिनिधी म्हणून जिल्हा प्रशासनानेही याकडे न पाहिल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत आगामी विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करुन शासनाला जाब विचारला जाईल,असे आम.जयंत पाटील यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासित केल्याचे सुत्रांनी सांगितले.
दरम्यान, चारजणांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात दोन महिलांचा समावेश आहे. 26 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास तीस आंदोलक बसले आहेत. त्यापैकी मच्छिंद्र माया सिद्धी (61, रा. थेरोंडा-आगलेची वाडी), वसंत रघुनाथ बंदरी (61, कोळीवाडा), चंद्रकांत मारुती कोळी (60, पेण), गीतांजली गोरखनाथ भाटे (61, रा. कोर्लई, ता. मुरूड), वासंती विद्या वेताळ (60), वंदना अविनाश शिणे (61) (दोघेही राहणार बोर्ली, ता. मुरूड) यांची प्रकृती खालावल्याने वैद्यकीय पथकास पाचारण करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.