पाली भूतीवली धरणातून दिवसाढवळ्या पाणीचोरी; संबंधित विभागाच्या सूचनेकडेही दुर्लक्ष
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सगळ्यात मोठे धरण असलेल्या पाली भूतीवली धरणातून बेकायदा पाणीउपसा होत असल्याची बाब समोर आली. त्यानंतर पाटबंधारे विभागाने तोंडी सूचनादेखील दिल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, चार दिवसांच्या अल्टिमेटमनंतरदेखील पाणीचोरांनी पाटबंधारे विभागाला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. धरणातून अजूनही पाणीउपसा सुरूच असून, धरणात थेट टाकलेल्या विद्युत वाहिन्यांमुळे मोठा अनर्थ घडण्याची चिन्हे आहेत. मात्र, दुसरीकडे कारवाईची माहिती नसल्याने पाटबंधारे विभाग वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवण्यात व्यस्त आहे, त्यामुळे पाणीचोरांचे फावले आहे.
कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यातील पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची समस्या दूर व्हावी आणि तेथील परिसर ओलिताखाली यावा म्हणून शासनाच्या पाटबंधारे विभागाने 40-42 वर्षांपूर्वी पाली-भुतीवली धरणाची निर्मिती केली. येथील परिसर हिरवागार करण्यासाठी बांधलेले हे धरण पाणीचोरांच्या निशाण्यावर आले आहे. धरणात जलवाहिनी टाकून थेट पाण्याची चोरी दिवसाढवळ्या सुरू आहे. सध्या तेथील ग्रामपंचायत धरणातून पाझरून जाणारे पाण्यावर योजना राबवत आहेत. मात्र, स्थानिक परिसरातील बांधकाम व्यावसायिक आणि फार्म हाऊस यांच्याकडून थेट धरणाच्या जलाशयात जलवाहिनी टाकून पाणी उचलून नेले जात आहे. दिवस-रात्र तीन ते चार पंप तेथे पाण्याचा उपसा करीत असून, पाण्याची उचल सुरू आहे. तर पाणीउपसा करण्यासाठी धरणाच्या पाण्यात थेट जलवाहिनी पंपासोबत विद्युतवाहक सोडण्यात आल्या आहेत. जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या मोर्या कालव्यांसाठी धरण परिसरात ठेवण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी त्या मोर्यादेखील फार्महाऊस मालकांनी पळविल्या, तर आता धरणाचे पाणी व्यवसायासाठी पळविले आहे. मात्र, तरीही त्यावर कारवाई करण्यासाठी रायगड लघु पाटबंधारे विभाग कचरत असल्याचे चित्र आहे.
माध्यमांत या विषयीच्या बातम्या प्रसिद्ध संधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी धरण परिसरात पाहणी केली होती. त्यानंतर संबंधित पाणीउपसा करणार्या व्यावसायिकांना 4 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र दिवस उलटूनही जलसंधारण विभागाच्या रायगड लघु पाटबंधारे विभागाचे 4 दिवस संपलेले नाहीत. तर साधे बिल देखील आकारले गेले नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.