कांगारूंचे फिरकीपुढे लोटांगण

भारताचा ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय; मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळविण्यात आला. दरम्यान, अवघ्या अडीच दिवसांत भारतीय गोलंदाज खास करून जडेजा-अश्‍विन या फिरकी जोडगोळीने कांगारूंची पळताभुई थोडी केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. 100 वी कसोटी खेळणारा चेतेश्‍वर पुजाराने विजयी चौकार मारला.

या सामन्याच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 1 विकेट गमावत 62 धावांच्या आघाडीसह फलंदाजीला उतरला होता. यावेळी भारताच्या रवींद्र जडेजा आणि आर अश्‍विन या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी झटपट विकेट्स गमावल्या. त्यांचे 4 फलंदाज तर एकाच धावसंख्येवर तंबूत परतले. यावेळी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 31.1 षटकात 113 धावांवर संपुष्टात आला. भारताच्या दुसर्‍या डावात 115 धावांचा पाठलाग करताना सुरुवात फार चांगली झाली नाही. अवघ्या 6 धावांवर भारताची पहिली विकेट पडली. राहुल केवळ एकच धाव काढू शकला. त्यानंतर रोहित शर्माने मोठे फटके मारत भारताचा डाव पुढे नेला. मात्र, 39 धावांवर रोहित धावबाद झाला. त्याने 31 धावा केल्या ज्यात 3 चौकार तर 2 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीलादेखील फार काही करता आले नाही. 20 धावा करून तो बाद झाला, तर श्रेयस अय्यर मोठा फटका मारताना 12 धावा करून बाद झाला. 100 वी कसोटी खेळणार्‍या पुजाराने संयमी खेळी दाखवत भारताला विजयापर्यंत पोहोचवले. त्याने 31 धावा केल्या. यष्टीरक्षक केएस भरतने 23 धावा करून दोन्ही नाबाद राहिले.

भारताकडून यावेळी गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा पुन्हा चमकला. त्याने यादरम्यान सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. तसेच, कसोटी कारकीर्दीतील विकेट्सचे 12वे पंचकही पूर्ण केले. त्याच्यासोबतच, आर अश्‍विन यानेही 3 विकेट्स नावावर केल्या. भारताच्या दुसर्‍या देशांसाठी घातक असणार्‍या जडेजा-अश्‍विन जोडीने कांगारूंना अक्षरशः घाम फोडला. त्यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज कथ्थक करताना दिसले. दुसर्‍या डावात 113 धावांवर ऑस्ट्रेलिया डाव आटोपला आणि विजयासाठी 115 धावांचे माफक आव्हान ठेवले होते आणि भारताने ते सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

इंदोरमध्ये तिसरी कसोटी
तिसरा कसोटी सामना 1 मार्च ते 5 मार्चदरम्यान इंदोरमध्ये खेळवला जाणार आहे. धर्मशाला येथे खरतर हा सामना होणार होता. मात्र, तेथील हवामान व्यवस्थित नसल्याने ते मैदान खेळण्यासाठी तयार होऊ शकले नाही म्हणून तो इंदोर येथे हलवण्यात आला. दोन्ही संघांना आता किमान आठ ते नऊ दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्यात भारतीय संघाची उर्वरित दोन कसोटीसाठी निवड होणार असून, कोणाला संघात स्थान मिळणार ह्याची चाहत्यांना उत्सुकता असेल.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : 78.4 षटकांत सर्वबाद 263, ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव): 31 षटकात सर्वबाद 113, भारत (पहिला डाव) : 83.3 षटकांत सर्वबाद 262, भारत (दुसरा डाव) : 26.4 षटकात 4 बाद 115.

Exit mobile version