। दुबई । वृत्तसंस्था ।
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. दुबईत झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ४ गाडी राखून ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठली आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग भारताने ४८.१ षटकात ६ गाडी गमावत पूर्ण केले. भारताकडून विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. त्याला श्रेयस अय्यरचीही चांगली साथ मिळाली.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ४९.३ षटकात सर्वबाद २६४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार स्टीव्ह स्मिथने ९६ चेंडूत सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तसेच, ऍलेक्स कॅरेने ५७ चेंडूत ६१ धावा केल्या. या दोघांशिवाय ट्रॅव्हिस हेडने ३९ आणि मार्नस लॅबुशेनने २९ धावा केल्या. या चौघांनीच २० धावांचा टप्पा पार केला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ बळी घेतले. तसेच, वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली होती. रोहितने सुरुवातीचा खेळ आक्रमक केला होता. परंतु, शुभमन गिल पाचव्या षटकात ८ धावांवर बेन ड्वारशुईच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्माही २९ चेंडूत २८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर मात्र विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी एकेरी-दुहेरी धावांबरोबरच खराब चेंडूवर चेंडू सीमापार करताना धावफलक हलता राहिल याची काळजी घेतली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारीही केली. यादरम्यान विराटने अर्धशतक पूर्ण केले. परंतु, ऍडम झाम्पाने श्रेयसला त्रिफळाचीत करत भागीदारी तोडली. श्रेयस ६२ चेंडूत ४५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराटला काही वेळ अक्षर पटेलने साथ दिली. परंतु, नॅथन एलिसने अक्षरला २७ धावांवर त्रिफळाचीत केले.
त्यानंतर विराटने एक बाजू सांभाळली. त्याला केएल राहुलने साथ दिली. त्यामुळे विराट आणखी एक शतक करेल, असे दिसत होते. परंतु, विराट झाम्पाच्या गोलंदाजीवर बेन ड्वारशुईकडे झेल देत बाद झाला. विराटने ९८ चेंडूत ५ चौकारांसह ८४ धावांची खेळी केली. विराट बाद झाल्यानंतर केएल राहुलला हार्दिक पांड्याने साथ दिली होती. मात्र, विजयासाठी ६ धावांची गरज असताना पांड्या २४ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर केएल राहुलने ४९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारत भारताचा विजय पक्का केला. केएल राहुलने ३४ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. रवींद्र जडेजा २ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना ऍडम झाम्पा आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. बेन ड्वारशुई आणि कुपर कोनोली यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात धडक
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चा उपांत्य सामना जिंकत सलग तिसऱ्यांदा अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. यापूर्वी भारताने २०१३ आणि २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही स्थान मिळवले होते. २०१३ मध्ये भारत विजयी झाला होता, तर २०१७ मध्ये उपविजेता होता. आता १२ वर्षांनी पुन्हा विजेतेपद मिळवण्याकडे भारताने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
सर्वोच्च धावांचा पाठलाग
आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये बाद फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला हा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग आहे. भारताने आपलाच २०११ विश्वचषकातील विक्रम मागे टाकला आहे. याआधी २०११ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताने २६१ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार केले होते.
.