। पुणे । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदवण्यासाठी ऑनलाईन अर्ज 11 मार्चपर्यंत करता येणार आहे.
परीक्षा परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. परीक्षा परिषदेतर्फे 9 फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. पाचवीच्या 5 लाख 46 हजार 874 विद्यार्थ्यांनी, तर आठवीच्या 3 लाख 65 हजार 855 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या http://www.mscepune.in, https://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अंतरिम सूचीवरील आक्षेप केवळ ऑनलाइन पद्धतीनेच दाखल करायचे आहेत. त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज पालकांसाठी संकेतस्थळावर, शाळांसाठी शाळा लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. 11 मार्चपर्यंत दाखल झालेले अर्जच ग्राह्य धरले जाणार आहेत.