विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी 9 आमदार अनुपस्थित
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने सोमवारी (4 जुलै) विश्वासदर्शक 164 मतांनी जिंकत आपले वर्चस्व सिद्ध करुन दाखविले आहे. ठरावाच्या विरोधात 99 मतं पडली. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे शिंदे सरकार विश्वासदर्शक ठरावाला कसे सामोरे जाते याबाबत कमालीची उत्सुकता होती.पण ती फोल ठरली. उलट काँग्रेसचे 9 आमदार अनुपस्थित राहिले होते. बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर आभार मानून काँग्रेसची अदृष्य मदत झाल्याचा गौप्यस्फोट केला. सोमवारी विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यावर सरकारवरील विश्वासदर्शक ठराव सादर करण्यात आला. आवाजी मतदानाने तो संमत करण्यात आला.यावेळी विरोधाच्या बाजुने 9 मते कमी पडल्याचे दिसून आले.याचा फायदा शिंदे सरकारला झाला.
का आले नाहीत आमदार?
सभागृह 11 वाजता सुरु झालं. पण काँग्रेसचे चार सदस्य उशिरा आले. सभागृहामध्ये प्रवेश देण्याची वेळ संपल्याने अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख यांना विश्वासदर्शक ठरावासाठी सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. तर जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने ते अनुपस्थित होते. त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे या परदेशी असल्याने त्या सभागृहात आल्या नाहीत. हे सहा महत्वाचे आमदार अनुपस्थित असल्याने विरोधकांची विश्वासदर्शक ठरावाची आकडेवारी 99 पर्यंतच पोहोचली.
तीन आमदार तटस्थ
समाजवादी आणि एमआयएमचे 3 आमदार तटस्थ राहिले आहेत. प्रस्तावाच्या विरोधात 99 जणांनी मतदान केलं आहे. विरोधी पक्षाला कालपेक्षा 9 मतं कमी मिळाली आहेत.
बंड का केलं? याच कारण शोधणे गरजेचे होते. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला. शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. गेले पंधरा दिवस, शिवसेनेचे 40 आमदार आणि अपक्ष 10 असे 50 आमदार विश्वास ठेवून सोबत राहिले. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. मुख्यमंत्रीपद मिळाल्याबाबत आजही विश्वास बसत नाही. पन्नास लोकांना घेऊन मिशन सुरू केले तेव्हा कुठे निघालो, किती दिवस लागतील, कुणीही विचारले नाही. मतदानादिवशी तणावात होतो. मतदानादिवशी नीट वागणुक मिळाली नाही, असा आरोप करत जी वागणुक देण्यात आली, ती सर्वांनी पाहिली आहे. अन्यायाविरुद्ध बंड पुकारायचे ही बाळासाहेबांची शिकवण आहे. खच्चीकरण कसे करण्यात आले हे सुनिल प्रभुंना माहिती आहे. त्यावेळी ठरवलं लढून शहीद झालो तरी चालेल मात्र मागे हटणार नाही. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सरकारला काँग्रेसची मदत
शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले त्यांचे आभार तर मानतोच पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे मदत केली, त्यांचेही आभार मानतो, असे फडणवीस यांनी म्हटले त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला.
भास्कर जाधवांची कठोर टीका
भाजपामध्ये आयात सदस्यांनी यादीच भास्कर जाधवांनी यावेळी वाचून दाखवली. सदस्यांची नावे घेतल्याने अध्यक्षांनी त्यांना थांबवले. कोण कुणाशी लढत आहे, हे समजून घ्या. लढाईत कधी थांबायचे हे कळेल तोच खरा योद्धा. या लढाईत शिवसेना, शिवसैनिक संपेल. त्यामुळे नीट विचार करा, असे आवाहनही भास्कर जाधवांनी केले.