फडणवीसांनी कबुली दिल्याचा गोखलेंचा दावा
पुणे | प्रतिनिधी |
शिवसेना-भाजपची युती झाली नाही. त्याबाबत मी देवेंद्र फडणीसांना विचारणा केली. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? असा सवाल मी त्यांना केला. त्यावर फडणवीसांनी चूक झाल्याचं सांगितलं, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केला आहे. गोखले यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांनाही उधाण आलं आहे.
पुण्यात एका कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना-भाजपला एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. अडीच वर्ष शिवसेनेला दिले असेल तर काय बिघडलं असतं असा प्रश्न मी एकदा फडणवीसांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची हवी? असा सवालही मी त्यांना केला होता. त्यावर चूक झाली असं फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा विक्रम गोखले यांनी केला.
खरं तर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं, त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना फसवू नका तुम्ही. लोक केव्हा तरी प्रचंड शिक्षा करतात. ती आता आपण भोगत आहोत, असं ते म्हणाले.
कंगनाचे समर्थन
कंगना राणावत जे म्हणाली त्यावर मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालं आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं गेलं आहे. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवलं नाही, हे चुकीचे आहे. मतपेढीचे राजकारण सुरू झाल्यापासून वाद निर्माण होत आहेत, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.