एलओसीजवळील सर्व हॉटेल्स रिकामे करण्याचा आदेश
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात धाडधाड मोठे निर्णय घेत आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानला आतापर्यंत अनेक धक्के दिले आहेत. आम्ही पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर भविष्यात कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता एलओसीजवळ मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तेथील स्थानिक प्रशासनाने एलओसीजवळील नीलम खोर्यातील सर्व हॉटेल्स रिकामे करण्याच आदेश देण्यात आला होता. या आदेशानंतर सर्व हॉटेल्स रिकामे करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. खबरदाही म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
भारत पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गातून कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भारताने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. भारतात पाकिस्तानी पंतप्रधानांचे यूट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहे. सोबतच पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब अख्तर याचेही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचा भारताने निर्णय घेतला आहे. यासह पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या काही अभिनेते, अभिनेत्रींची इन्स्टाग्राम खातीही भारतात बंद करण्यात आली आहेत. यात अभिनेत्री हानिया आमीर, अभिनेत्री माहिरा खान यासारख्या दिग्गज चेहर्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने अटारी सीमा बंद केली होती. मात्र आता ही सीमा चालू करण्यात आली आहे. पाकिस्तान स्वत:च्याच नागरिकांना गेट उघडत नसल्याची परिस्थिती तेथे पाहायला मिळत आहे. ज्या पाकिस्तानी नागरिकांकडे भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकित्तान त्यांच्या देशात प्रवेश देत नाहीये. काही नागरिक हे दोन दिवसांपासून अटारी सीमेवर अडकेलेले आहेत. मात्र सध्या फक्त पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या नागरिकांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जात आहे.
मुस्लिम राष्ट्र समूहाचा पाकला पाठिंबा
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. भारत हल्ला करेल याची पाकिस्तानला भीती वाटत आहे. पाकिस्तान आता मुस्लिम देशांकडून पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. वृत्तानुसार, 57 देशांची संघटना असलेल्या ओआयसी (ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन) ने पाकिस्तानला पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. अलिकडेच, पाकिस्तानने दक्षिण आशियातील सध्याच्या परिस्थितीबद्दल ओआयसीला माहिती दिली होती, ज्यामध्ये भारताने केलेल्या कृतींना प्रादेशिक शांततेसाठी गंभीर धोका असल्याचे वर्णन केले होते.
ओआयसी राजदूतांनी पाकिस्तान आणि त्यांच्या जनतेला एकता आणि पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. त्यांनी राजनैतिक संवादाद्वारे आणि प्रादेशिक तणावाची मूळ कारणे ओळखून तणाव कमी करण्याचे आवाहन केले. या दरम्यान, जम्मू आणि काश्मीर वादाचा विशेषतः उल्लेख करण्यात आला आहे. काश्मीर प्रश्नाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि ओआयसीच्या ठरावांना पाकिस्तानच्या राजदूतांनी पाठिंबा दिला आहे. न्यू यॉर्कमध्ये झालेल्या ओआयसी राजदूतांच्या बैठकीत पाकिस्तानने दक्षिण आशिया मुद्द्यावर आपले विचार मांडले. संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने केलेली कारवाई प्रक्षोभक, राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बेजबाबदार होती. त्यांनी ओआयसीच्या सदस्य देशांना भारताच्या या भूमिकेचा आणि त्याच्या संभाव्य परिणामांचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.