प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणाचा फटका
रस्त्याअभावी गरोदर स्त्रिया, विद्यार्थी, नागरिकांचे हाल
| नागोठणे | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद दुर्गम भागातील काही गावे, आदिवासी वाड्या यांना त्यांच्यापर्यंत विकासाची वाट पोहोचली नसल्याने साजरा करता आलेला नाही. काहीसा हाच अनुभव नागोठण्याजवळील, परंतु पेण तालुक्यात समाविष्ट असलेल्या पाबळ ग्रामपंचायत हद्दीतील पावटावाडी व गौळावाडीतील आदिवासी बांधवांना येत आहे. सध्यातर जांबोशी ते गौळावाडी या सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्त्याची वाट चिखलामुळे बिकट झाल्याने गरोदर स्त्रिया, विद्यार्थी व नागरिक यांचे अतोनात हाल होत आहेत. या गंभीर बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आदिवासी बांधव आक्रोश व्यक्त करीत आहेत.
पेण तालुक्यातील अतिदुर्गम अशा पाबळ खोर्यातील डोंगराळ भागात पावटावाडी व गौळावाडी या आदिवासी ठाकूर समाजाच्या वाड्या आहेत. गौळावाडीत सुमारे 50 तर पावटावाडीत साधारण 15 घरांची वस्ती असून, सुमारे 500 ते 600 एवढी येथील लोकसंख्या आहे. या वाड्यांतील सर्व नागरिकांना दररोज रोजगारासाठी तसेच विद्यार्थ्यांना चौथीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी नागोठणे व पाली (सुधागड) येथेच जावे लागते. या वाड्यांवर येण्यासाठी जांबोशीपासून गौळावाडीपर्यंत असलेल्या सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्त्यावरूनच सर्वांना पायपीट करावी लागते. या रस्त्यावरून उन्हाळ्यात दुचाकी, तीनचाकी वाहने जात असली तरी पावसाळ्यात होणार्या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गरोदर स्त्रीला जर प्रसूती वेदना झाल्यास डोली करूनच जांबोशीपर्यंत न्यावे लागते. त्यामुळे शासनाच्या पेण येथील आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अथवा अन्य योजनेतून आतातरी आम्हाला रस्ता मिळावा, अशी माफक अपेक्षा पावटावाडी व गौळावाडीतील आदिवासी बांधव बाळगून आहेत.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
या रस्त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. तसेच शासनाच्या गाव व वाडी तिथे रस्ता ही योजनाही शासकीय अधिकार्यांच्या नाकर्तेपणामुळे येथे अद्याप पोहोचलेली नाही. या रस्त्याच्या काही भागात वन खात्याचीही अडचण आहे. सद्यःस्थितीत जांबोशी ते गौळावाडी या रस्त्याची चिखलामुळे अत्यंत दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दुचाकी चालविणे तर सोडाच, साधे चालणेही सध्या मुश्कील झाले आहे.