। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड शहरातील आझाद चौकात 31 जानेवारी जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्सहात साजरा करण्यात आला. मुरुड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पंकज भुसे,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुरुड श्रीवर्धन व म्हसळा या तीन तालुक्यावर नवाब सरकराची राजवट होती. मुरुड येथील राजवाड्यावरून ते या तीन तालुक्याचा कारभार चालवत असत.भारताला स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947 ला मिळाले असले, तरी जंजिरा संस्थान नवाबाच्या ताब्यात असल्याने भारतात विलीन होण्यासाठी प्रत्यक्षात 31 जानेवारी 1948 रोजी सामील नाम्यावर सही झाल्यावर हे संस्थान भारतात समाविष्ठ झाले होते. सदरचा लोकमहोत्सव शासनाकडून साजरा होण्यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 31 जानेवारी रोजी जंजिरा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी आझाद चौकात ध्वजारोहण संपन्न झाल्यावर जंजिरा संस्थांचा इतिहास सांगणारा कार्यक्रम संपन्न होत असतो परंतु कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात येऊन फक्त ध्वजारोहण करण्यात आले. सदरील ध्वजारोहणासाठी नितीन गवारे,नायब तहसिलदार- गोविंद कोटंबे, पांडुरंग आरेकर,युगा ठाकुर, वासंती उमरोटकर,श्रीकांत सुर्वे, डॉ. राज कल्याणी,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत राजांकर, प्रमोद भायदे ,आदेश दांडेकर,मेघराज जाधव, नयन कर्णिक,शुभांगी करडे ,आदी मान्यवर उपस्थित होते
रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघ यांचे संयुक्त विद्यमाने गेल्या 12 वर्षांपासुन जंजिरा संग्राम दिन साजरा करीत आहे. मुरूड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांत नवाबांचे जंजिरा संस्थान होते.गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी वटहूकूम जारी करुन संस्थांनिकांना भारतात विलीनीकरणास भाग पाडले.यामध्ये मराठवाड्याच्या निजामांचा व जंजिरा संस्थानच्या नवाबांनी सामिलनाम्यावर स्वाक्षरी करण्यास विलंबाने संमती दिली.हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी तर जंजिरा संस्थान 31 जानेवारी 1948 रोजी भारतात विलीन करण्यात आले.जंजिरा संस्थानात रक्ताचा एक थेंब ही न सांडता संस्थान विलीन झाले. नानासाहेब पुरोहित, हरिभाऊ भडसावळे,मोहन धारीया, खांबेटे यांनी तीव्र लढा देऊन मोलाची कामगिरी केली आहे. जंजिरा मुक्ती संग्राम दिन साजरा व्हावा अशी पत्रकार संघाची भूमिका आहे. शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.जंजिरा मुक्ती संग्राम दिन हा लोकोत्सव व्हावा अशी यावेळी त्यांनी मागणी केली .