संत्रा प्रक्रिया उभारणार: जयंत पाटील

| काटोल | प्रतिनिधी |

काटोल आणि नरखेड तालुका संत्रे उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. विदर्भात संत्राचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. तरीसुद्धा येथे संत्रा प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही. काटोल विधानसभा क्षेत्रात वैयक्तिक संत्रा प्रक्रिया प्रकल्प उभारणार असल्याची ग्वाही शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केली.

शेतकरी कामगार पक्षाचा काटोल येथे विदर्भ विभागीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमूख ॲड. मानसी म्हात्रे, राज्य सहचिटणीस राहुल देशमुख, पुरोगामी युवक संघटना प्रदेश अध्यक्ष आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, कोषाध्यक्ष अतुल म्हात्रे, ॲड. राजेंद्र कोरडे, शेतकरी सभा राज्य अध्यक्ष प्रा. एस. व्ही. जाधव, राज्य सहचिटणीस बाबासाहेब देवकर, चिटणीस मंडळ सदस्य रामदास जराते, मोहन गुंड, प्रदिप देशमुख जयश्री वेळदा आदी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, 35 लोकांची टीम तयार करा. संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबाबत अग्रेसर ठोस कामाच्या गतीची फलश्रुती येत्या काही महिन्यातच पहायला मिळणार आहे. विदर्भात शेकाप पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम माजी आमदार स्व. विरेन्द्रबाबू देशमुख यांनी केले. त्याची फलश्रुती विदर्भात शेकाप पक्षाचा मोठा कार्यकर्ता वर्ग कार्यरत आहे. स्व. विरेन्द्रबाबू देशमुख यांचे यावेळी जयंत पाटील यांनी आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निखिल देशमुख, प्रास्ताविक धीरज ढोले, आभार अरुण मानकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अशोक जवंजाळ, महेश चांडक, सुरेंद्र लोही, मनोज वंजारी, संजय वाढीवा, राज शेंद्रे, सुहास बाविस्कर, मिलिंद जोगेकर, भाविन खोना आदींनी सहकार्य केले.

ताकदीने निवडणूका लढणार
पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आगामी काळात होणार आहेत. शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर पूर्ण निवडणूक ताकतीने लढणार असल्याचे शेकाप पक्षाचे सहचिटणीस राहुल देशमुख स्पष्ट केले.यावेळी प्रचंड महागाई, शिक्षणाचे व्यापारीकरण, शेतकरी वर्गाचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या, शेकाप पक्ष बांधनी, भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणूका, यावर मंथन करण्यात आले.
जयंत पाटील यांचे जल्लोषात स्वागत
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचे काटोलमध्ये आगमन होताच, त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोलताशांचा गजर, फुलांच्या वर्षाव करीत शेकापचा जयघोष करण्यात आला. दरम्यान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर स्व. विरेन्द्रबाबू देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
Exit mobile version